''केंद्राने बनवलेले कायदे हे शेतकऱ्यांसाठी डेथ वॉरंट''

AAP
AAP

केंद्र सरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी मागील तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलन करत आहेत. याशिवाय, सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात झालेल्या अनेक चर्चा आतापर्यंत निष्फळ ठरलेल्या आहेत. त्यानंतर आज शेतकरी आंदोलन आणि शेतीविषयक नवीन वादग्रस्त कायद्यांवरून आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी मेरठ येथे बोलताना केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारने शेती कायदयांमध्ये सुधारणा म्हणून केलेल्या विधेयकातील तीन कायदे हे शेतकर्‍यांसाठी डेथ वॉरंट असल्याचे म्हटले आहे. तसेच या कायद्याच्या आधारावर सरकारला शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून 3-4 भांडवलदारांच्या खिशात देण्याची इच्छा असल्याचा गंभीर आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. आणि त्यानंतर शेतकरी हे त्यांच्याच शेतात मजूर होणार असून, हा कायदा शेतकऱ्यांसाठी करा किंवा मरा अशी परिस्थिती निर्माण करणारा असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

यानंतर, पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांनी देखील अशा प्रकारचा अत्याचार केला नसल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हणत, ब्रिटिशांनी सुद्धा जमिनीवर खीळ ठोकले नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सध्याच्या केंद्र सरकारने बिटिशांना देखील मागे टाकेल असल्याची टीका अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केली. तसेच सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आंदोलन करत असलेल्या आणि या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांच्या विरोधात देशविरोधी कारवाई केली असल्याचे म्हणत गुन्हे दाखल केले आहेत. इतकेच नाही तर, त्यांच्याकडून शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून संबोधले जात असल्याचे सांगत, पारतंत्र्याच्या काळात सुद्धा ब्रिटिशांची एवढी हिंम्मत नव्हती, असे अरविद केजरीवाल यांनी सांगितले. 

याव्यतिरिक्त, प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅली परेडच्या वेळेस लाल किल्ल्यावरील घटना ही त्यांच्याच कटाचा भाग असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. आणि याशिवाय त्यावेळेस शेतकऱ्यांना दिल्लीतील रस्ते माहित नसल्यामुळे त्यांना मुद्दामहून चुकीचा मार्ग दाखविण्यात आला असल्याचे काही जणांनी आपल्याला सांगितल्याचे अरविंद केजरीवाल म्हणाले. यानंतर लाल किल्ल्यावर ज्यांनी झेंडे फडकावले ते भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. व देशातील शेतकरी हे देशद्रोही असूच शकत नसल्याचे त्यांनी पुढे म्हटले. 

दरम्यान, शेतकरी अनेक महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर नवीन कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत. आणि या आंदोलनाचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्लीत ट्रॅक्टर परेडचे आयोजन केले होते. या परेडच्या वेळेस दिल्लीतील काही भागात मोठ्या प्रमाणावर हिंसक घटना घडल्या होत्या. शिवाय त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सेलिब्रेटींनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सोशल मिडियाच्या ट्विटरवरून पाठिंबा दर्शविला होता. याप्रकरणात टूलकिट तयार केल्याच्या कारणावरून दिल्ली पोलिसांनी देशातील काही भागात जाऊन धरपकड केली होती.            
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com