पणजी : पर्यटन व खाणकाम क्षेत्रे कोलमडल्याचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे प्रती घरटी उत्पन्न 50 टक्क्याने घटले आहे. त्याचा परिणाम खर्चाचे प्रमाण 30 टक्क्याने घटण्यावर झाला आहे. या साऱ्यामुळे राज्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असून त्याचा मानशास्त्रीय परिणाम मोठा असल्याचे मत चर्चेत व्यक्त करण्यात आले आहे.
मेटॉलॉजिक पीएमएस संस्थेने खाणकाम बंदी आणि तिचे सामाजिक परिणाम या विषयावर हे चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल, केंद्र सरकारचे माजी सचिव डॉ. अरुणा शर्मा, गोवा खनिज निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष अंबर तिंबले, गोवा खाण लोकमंचचे अध्यक्ष पुती गावकर, खाण अभियंते संघटनेचे प्रदेश अध्यक्ष क्लेटस डिसोझा, मंचचे मार्गदर्शक चारुदत्त पाणीग्रही, संस्थापक मोनिका बच्चन सहभागी झाले.
काब्राल म्हणाले, गेली तीन वर्षे खाणी बंद आहेत. कोविड महामारीमुळे पर्यटन क्षेत्राला मार बसला आहे. त्यामुळे कर्ज काढून जगण्याची वेळ अनेकांवर आली आहे. सरकारलाही दर महिन्याला कर्जरोख्यांच्या रुपात कर्ज घ्यावे लागत आहे. आज कर्ज घेतले तरी कधीतरी ते फेडावेच लागणार आहे. त्यात राज्य आणखीन कोलमडणार आहे. खाणकामावरील पहिल्या बंदीनंतर खाण क्षेत्रातील व्यावसायिक सावरत असतानाच ही दुसरी बंदी आली आणि सारे उद्ध्वस्त झाले आहे. बचत केलेले पैसे तर संपले आहेत वर आहे त्या वस्तू, दागिने विकून जगण्याची वेळ या खाणकामबंदीने अनेकांवर आणली आहे.
खाणकामबंदी पूर्वी सकल राज्य उत्पादन वाढीचा वेग 20-25 टक्के होता तो आता पूर्णतः खाली आला आहे याची दखल केंद्र सरकारने घ्यावी.
तिंबले म्हणाले, गोव्यातील खनिज हे कमी प्रतीचे आहे. त्यामुळे ते देशांतर्गत न वापरता निर्यात केले जाते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.