Blog: स्तुती, निंदा आणि त्यांचे प्रयोजन

प्रवचनात आपण ऐकले असेल की, साखरेपेक्षाही गोड काय आहे? खरे तर हा प्रश्‍न सर्वसामान्यांना बुचकळ्यात टाकणारा आहे. पण तज्ज्ञ मंडळी सांगतात की, साखरेपेक्षा गोड जर काय असेल तर ती प्रशंसा, स्तुती.
Blog
Blog Dainik Gomantak

प्रा रामदास केळकर

प्रवचनात आपण ऐकले असेल की, साखरेपेक्षाही गोड काय आहे? खरे तर हा प्रश्‍न सर्वसामान्यांना बुचकळ्यात टाकणारा आहे. पण तज्ज्ञ मंडळी सांगतात की, साखरेपेक्षा गोड जर काय असेल तर ती प्रशंसा, स्तुती.

हो, म्हणून तर अनेकजण आपला संवाद प्रभावी करण्यासाठी स्तुतीचा व स्तुती करणाऱ्यांचा आधार घेतात. त्यांना भाट, खूश-मस्करी करणारे, स्तुतीपाठक, चमचे अशा नावानेही आपण ओळखतो. खरे तर कोणी स्तुती करू लागला तर आपण जास्त सावध राहिले पाहिजे. पण, काहीजण याचा अस्त्र म्हणून उपयोग करतात व आपला हेतू साध्य करतात. अशांपासून सावध राहिलो तरच आपले स्थान आपण वाचवू शकतो.

पण, आपण त्यांच्या आहारी गेलो तर पतन होणे कठीण नाही. काहीवेळा हे फसवे असू शकते ते जाणून घेण्यासाठी प्रज्ञेची जशी गरज आहे तसा अनुभवही माणसाला तारून नेतो. अनेकदा माणसाचे पतन या खुशमस्कऱ्यांच्या कोंडाळ्यामुळे होते. पण कळेपर्यंत उशीर झालेला असतो. या उलट जर आपण विचार केला तर सर्वांत कडू काय असेल? तर त्याला उत्तर असेल स्पष्टपणा किंवा रोखठोकपणा !

Blog
Education System: सक्षम, कार्यक्षम शिक्षण व्यवस्थेसाठी...

अनेकदा रोकठोक किंवा स्पष्टवक्त्याला कुणी जवळ घ्यायला बघत नाही. खरे तर ते आपल्याला एक प्रकारे कडू औषध देतात आणि औषध आपले आरोग्य ठीक करते ना! आधुनिक इतिहासात बाळ ठाकरे स्पष्टपणे रोखठोकपणे बोलत. अनेकांना ते आवडत नसे. प्रभू रामचंद्र असो वा भगवान कृष्ण असो त्यांच्या अवतीभवती असे भाट नसणार का? पण त्यांनी प्रज्ञेच्या जोरावर कटू वाटणारे पण अंतिमतः भले करणारे निर्णय घेतले. म्हणून तर ही आपली दैवते आहेत.

आपण क्षणिक सुख बघत असतो म्हणून असे भाटगिरी करणारे खुशमस्करे आपल्या अवतीभवती हवे असतात. आता सोशल मीडियामुळे तुमचे कारनामे जगाला लवकरच समजतात. तेव्हा इतर गोष्टी जशा बदलत आहेत त्याप्रमाणे आपल्यालाही बदलावे लागेलच.

अशा फसव्या वागणुकीने आपण आपलेच नुकसान करणार आहेत याची जाणीव जेवढी लवकर होईल तेवढे बरे. स्तुती ऐकणे, भारावून जाणे हे प्रकार आपल्याला अपंगच करतात याची जाणीव आपण ठेवायला हवी. विशेष म्हणजे हे अपंगत्व आपल्याला दिसत नसले तरी कालांतराने अनुभवता येते. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. ज्या कामासाठी आपण नेमले गेलो आहोत, ते कसे करावे?

यासाठी तज्ज्ञाचे मार्गदर्शन जरूर घ्यावे पण काम जरूर करावे. अमकासांगतो तमका सांगतो म्हणून नव्हे. ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’, ही उक्ती नेहमी लक्षात ठेवावी. पूर्वी राजे महाराजे भाटगिरी करणाऱ्यांना वेतनावर ठेवत. आताही ठेवले जातात मालकाचे हित बघण्यासाठी. येणाऱ्या किंवा भेटणाऱ्याला गिर्‍हाईक म्हणून आपण वागविले तर तोदेखील त्याच पद्धतीने वागेल. त्याच्याकडून माणुसकीचे दर्शन घडेल याची खात्री आपण ठेवू नये. आपला स्वार्थ साधण्यासाठी दोन्हीकडून निश्चितपणे प्रयत्न होत असतात.

पूर्वीच्या काळी बार्टर पद्धती होती म्हणजे आपल्याकडे जास्त असलेल्या वस्तूच्या बदल्यात आपल्याला जे हवे किंवा गरज आहे त्या गोष्टी घ्याव्यात. आजसुद्धा यात फरक पडलेला नाही. आपण जर नोकरी विकत देता, तर नेमलेला कर्मचारी त्या हिशेबांसह वागेल यात आश्चर्य ते कसले? काहीजण मतांचा डोळा ठेवून काम करतात. खरे खोटे देव जाणे! पण पैसे देऊन काम करणारा काय विचार करेल? फुकट थोडेच काम केले आहे? म्हणून बदलाची अपेक्षा जर ठेवायचीच असेल तर आपल्याकडून त्याची सुरुवात व्हायला हवी.

‘आधी केले, मग सांगितले’ याची नितांत गरज आहे. हे अंगवळणी व्हायला वेळ लागणार, पण त्याचे योग्य परिणाम कालांतराने दिसतील. इतिहासाची, घटनेची मोडतोड करून एखादा लिहितो तेव्हा एक प्रकारे तो व्यवस्थेला खूश ठेवण्याचा प्रयत्न करत नाही काय? किंवा एखाद्या पारितोषिकाकडे पुरस्काराकडे बघत तसे लिखाण होत नसते काय?

ही एक प्रकारची खूश मस्करीच नाही का? असो! देवालाही आपण आरत्या म्हणून खूश ठेवत नाही काय? अर्थात त्या खूश ठेवण्यात जर स्वार्थ दडलेला नसेल तर देवदेखील निश्चितपणे प्रसन्न होतो. संत नामदेवांनी म्हटलेले प्रसिद्ध आहे भक्ती घेतल्याशिवाय देव कुठे प्रसन्न होतो? याचा अर्थ आपणही माणसाची स्तुती करावी व काम करून घ्यावे, असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. कारण आपण देव कुठे आहोत?

एका श्रीमंत गृहस्थाचा चालक वारल्याचे मालकाला समजले तो त्यावेळी विमान प्रवासात होता त्याने लगेच मी पोहोचेपर्यंत अंत्ययात्रा काढू नका असा संदेश पाठविला. मालक पोहोचल्यानंतर त्यांनी त्या चालकाची प्रेतयात्रा आपल्या महागड्या गाडीने नेली व त्या गाडीचे चालकत्व आपण स्वीकारले. एकूण काय अशा प्रकारे जर नीट संबंध ठेवता आले तर देवाचे सांगता येणार नाही, पण संपर्कातील माणूस प्रसन्न नक्कीच होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com