मनाची सकारात्मक आणि भावस्पर्शी स्पंदने...

भले बुरे जे घडून गेले’ हा या पुस्तकातला वैशिष्ट्यपूर्ण लेख.
Novel
Novel Dainik Gomantak

- नारायण महाले

जमोहन शेट्ये हे हे हरहुन्नरी आणि उत्साही व्यक्तिमत्व. व्यवसायाने चित्रकला शिक्षक गोव्यातील सामाजिक, वांग्मयीन, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचा संघटनात्मक स्वरुपाचा सक्रिय वावर आहे. ते मूलतः सृजनशील व क्रियाशील वृत्तीचे आहेत. ‘चित्रकलेतून मराठी भाषेचा अविष्कार’ या विषयावर, त्यांनी गोव्यात (Goa) अनेक ठिकाणी कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यांना काव्यलेखनाचीही आवड आहे. ‘आल्या निवडणुका आता’ ह्या त्यांच्या गाजलेल्या कवितेत, सध्यकालीन सामाजिक व राजकीय वास्तव त्यानी व्यंगात्मक शैलीतून मांडलं होतं.

‘स्पंदने मनाची’ (2021) हे त्यांचे ललित लेखांचे पहिलेच पुस्तक. नेहमीच्या व्यवहारात येणाऱ्या बऱ्यावाईट अनुभवांचे चित्रण हा यातल्या लेखनाचा केंद्रबिंदू. त्यात सद्यकालीन घडामोडींचं त्यांनी डोळसपणे केलेलं अवलोकन आणि त्यांच्या सकारात्मक विचारांची गुंफणही दिसून येते.‘गाठोडं’ ह्या ललित निबंधात, माणसाची आजची कथा आणि व्यथा सांगताना, आजच्या धकाधकीच्या आणि संगणक युगाच्या जमान्यात ‘माणुसकी’ नावाचा प्रोग्राम, आजचा माणूस हरवुन बसल्याचे संकेत लेखक देतो व भविष्यकालीन संकटाचे सूचनही करतो. देशातील वर्तमानकालीन भयावह सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे चित्रण करताना, आम्ही सुशिक्षित होत चाललो आहोत की स्वार्थी आणि महत्त्वाकांक्षी असाही प्रश्न लेखक ‘माणुसकीचे स्वराज्य येवो’’ या लेखात उपस्थित करतो.

‘भले बुरे जे घडून गेले’ हा या पुस्तकातला वैशिष्ट्यपूर्ण लेख. कोरोनाने (Corona) साऱ्या जगाला काही क्षण थांबून विचार करायला भाग पाडले. गरजेनुसार वागावं हा शहाणपणा आपल्याला कोरोनाकडून नव्याने शिकता येईल असं परखडपणे तो सांगतो. कोरोनाकाळात उद्भवलेल्या भयानक स्थितीशी मुकाबला करूनही कार्यरत राहिलेल्या समाजघटकांप्रति लेखकाने ‘दिल दिया है’ या लेखात कृतज्ञता व्यक्त केली आहे. कोरोनामुळे थांबलेल्या शिक्षणाची दशा व दिशा ‘ऑनलाईन शिक्षण पद्धती’ या लेखात मांडली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शिक्षण अर्थपूर्ण करता येते असे त्याला वाटते. लोकसंख्येच्या तुलनेत 65 टक्के संख्या असलेल्या भारतीय युवकांच्या मानसिकतेचा वेधही लेखक घेतो. डोळ्यावर झापड बांधून चंगळवादाच्या मागे धावणार्या युवकांना, ‘आयुष्य मस्तीचे आहे पण शिस्तीने जगायचे आहे’ असा संदेश लेखक देतो.

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ‘युवा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. युवा दिन साजरा करताना आपल्या देशातील युवक त्यांच्या विचारप्रणालीचे निष्ठेने पालन करतो कि नाही असा ही रास्त प्रश्न ‘स्वामी विवेकानंद: प्रभावी व्यक्तिमत्व’ या लेखात लेखकाने मांडला आहे. ‘दैवाला दोष देत बसण्यापेक्षा, चला उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका’- हा विवेकानंदांचा विचार त्यांना महत्त्वाचा वाटतो.

लेखक आपल्या सभोवती घडणाऱ्या वर्तमानकालीन घटनांचा डोळसपणे वेध घेताना दिसतो. गोव्यातल्या (Goa) सत्तरी तालुक्यात घडलेल्या चार वाघांच्या हत्येचीही लेखकाने नोंद घेतली आहे. माणसाने आपली भौतिक प्रगती केली खरी पण तो निसर्ग, वन्य प्राणी, पशू-पक्षी यांच्या जीवावर उठला आहे. सभोवतालच्या सृष्टीचे संरक्षण करून मानव आणि पशुपक्ष्यांच्या जीवनामध्ये समतोल साधला तरच माणसाचं जीवन अर्थपूर्ण होईल असा विचार या पुस्तकात अधोरेखित झाला आहे.राजमोहन शेट्ये यांचे हे पहिलेच पुस्तक आहे. त्यात त्यांच्या सकारात्मक विचारधारेचे नितळ प्रतिबिंब उमटले आहे. त्यांची विचारधारा सगळ्यांना विचार करायला लावणारी अशीच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com