Goa: जीर्ण पुन्हा हे उजळू दे

1663 साली आदिलशहाकडून शिवाजी महाराजांच्या ताब्यात आलेल्या या भागाने खूप राजकीय स्थित्यंतरे पाहिली आहेत.
Goa: जीर्ण पुन्हा हे उजळू दे

Goa: जीर्ण पुन्हा हे उजळू दे

Dainik Gomantak 

अवघ्या काही दिवसांपूर्वी खोर्जुवे इथल्या किल्ल्याच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाल्याची घोषणा तिथले आमदार ग्लेन टिकलो आणि आणि उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी समारंभपूर्वक केली. या किल्ल्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करता काही विलक्षण योगायोगाच्या नोंदी आढळल्या. पहिला योगायोग म्हणजे या किल्ल्यासंबंधीची सर्वात जुनी लिखित नोंद सापडते ती 1710 साली, म्हणजे साधारण तीनशे वर्षांपूर्वी झालेल्या या किल्ल्याच्या (Fort) दुरुस्तीची. त्यापूर्वी हा किल्ला कोणी व कधी बांधला याचा उल्लेख इतिहासात कुठेच सापडत नाही. 1710 साली दुरुस्त झालेल्या (या किल्ल्याची मधल्या ऐतिहासिक काळातही दुरुस्ती वगैरे झाली असेलच कदाचित. तरीसुध्दा...) ह्या किल्ल्याचे राजकीय महत्त्व आता पूर्वीसारखे उरलेले नसले तरी वारसाप्रेमींच्या आणि ग्रामस्थांच्या मागणीमुळे दहा वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या किल्ल्याच्या या दुरुस्तीकामाला सुरू होण्यास आज 2022 सालच्या निवडणुकीचा मुहूर्त मिळणे ही अगदी दुसरी ऐतिहासिक घटनाच झाली. नाही का?

1663 साली आदिलशहाकडून शिवाजी महाराजांच्या ताब्यात आलेल्या या भागाने खूप राजकीय स्थित्यंतरे पाहिली आहेत. शिवाजी महाराजांनी जहागिरी वगैरे पद्धती आपल्या काळात बंद केल्या होत्या, पण त्यांच्या मृत्यूनंतर जहागिरीची पद्धत पुन्हा हळूहळू आकाराला येऊ लागली. अशी नोंद आहे की 1695 साली हा भाग राजाराम महाराज आणि मोगल या दोन्हीकडून सावंताना जहागीर म्हणून प्रदान करण्यात आला. म्हणजे पहा, हे पुन्हा अलीकडच्या काळासारखे झाले. एकच ‘प्लॉट’ दोघांकडून एकालाच विकला जाणे किंवा एकाच मतदारसंघाचे तिकीट एकाच उमेदवाराला दोन-दोन पक्षांकडून मिळण्याचे आश्वासन मिळणे वगैरे. अगदी तसेच. राजकारण (Politics) हे सर्व काळ असेच असते.

<div class="paragraphs"><p>Goa: जीर्ण पुन्हा हे उजळू दे</p></div>
लवू यांचा MGP आणि TMC वर 'खळबळजनक' आरोप!

10 मे 1746 साली हा किल्ला पोर्तुगीजांनी (Portugal) सावंतांकडून जिंकून घेतला. अशी नोंद आहे की या किल्ल्याचे त्या वेळचे किल्लेदार कोमा सावंत यांनी पोर्तुगीजांविरुद्ध जोरदार लढा दिला. पोर्तुगीजांनी त्यांना लालचावणारी ऑफरही दिली, परंतु कोमा सावंत यांनी ती धुडकावून लावली व लढाई जारी ठेवली. या लढाईत शेवटी कोमा सावंत मारले गेले. हा किल्ला त्याकाळी व्यापारी दृष्टीने महत्त्वाचा होता. हा किल्ला जिंकल्यानंतर त्याकाळच्या पोर्तुगीच गव्हर्नरने ‘मार्कोस दि हळर्ण’ ही पदवी ही स्वतःलाच बहाल केली.

नदीच्या वरच्या बाजूने (म्हणजे साधारण तिळारीच्या खोऱ्यात)असलेले रामघाट हे क्षेत्र त्याकाळी महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. शापोरा नदीमार्गे हा सारा व्यापार चाले. या व्यापाराला संरक्षण मिळावे या दृष्टीने या किल्ल्याला महत्त्व होते. सावंतांकडून किल्ला जिंकल्यानंतर आठच वर्षांनी नानासाहेब पेशव्यांकडून मध्यस्थी करण्यात आली व हा किल्ला पोर्तुगीजांकडून पुन्हा सावंतांच्या ताब्यात गेला. 1785 साली पोर्तुगीजांनी तो पुन्हा सावंतांकडून जिंकून आपल्या ताब्यात घेतला. गोवा (Goa) मुक्त होईपर्यंत हा किल्ला त्यानंतर पोर्तुगीज (Portugal) राज्याचा भाग राहिला.

त्या काळी व्यापारात आपले योगदान देणारा हा किल्ला खरं तर अलीकडच्या काळात ढासळतच चालला होता पण या निवडणुकीचा (Election) मुहूर्त साधून त्याला आश्वासनाचा आणखीन एक टेकू समारंभपूर्वक मिळाला आहे. या किल्ल्याच्या नूतनीकरणासाठी आणि तिथले पर्यटन (Tourism) महात्म्य वाढवण्यासाठी 2 कोटी 63 लाख रुपयांची तजवीज झाली आहे. या किल्ल्याचे भाग्य इतक्या रकमेत उजळेल की नाही हे येणारा काळच सांगेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com