Commencement of sandalwood and bamboo cultivation
Commencement of sandalwood and bamboo cultivation

चंदन आणि बांबू लागवड उपक्रमाची सुरुवात

नवी दिल्ली, 

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने आपल्या मालमत्तेतून कमाई करण्यासाठी प्रथमच चंदन आणि बांबू लागवडीचा मात्र अतिशय फायदेशीर उपक्रमाची सुरुवात केली. चंदन आणि बांबूच्या व्यावसायिक वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी केव्हीआयसीने 262 एकर जमिनीवर आपल्या नाशिक प्रशिक्षण केंद्रामध्ये चंदन आणि बांबूची प्रत्येकी 500 रोपे लावून या मोहिमेचा शुभारंभ केला.

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केव्हीआयसी च्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

केव्हीआयसीने उत्तरप्रदेश मधील कनौज येथील सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा घटक असलेल्या सुगंध आणि स्वाद विकास केंद्रातून चंदनाची रोपे तर आसाममधून बांबूची रोपे आणली आहेत. केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांच्या हस्ते काल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला.

केव्हीआयसीने मालमत्ता निर्माण करण्याच्या उद्देशाने चंदन लागवडीचे नियोजन केले आहे.  करण आगामी 10 ते 15 वर्षात चंदन लागवडीपासून 50 ते 60 कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न प्राप्त होईल असा अंदाज आहे. चंदनाचे झाड 10 ते 12 वर्षात पूर्ण तयार होते आणि सध्याच्या भावाप्रमाणे चंदनाचे एक झाड 10 लाख ते 12 लाख रुपयांना विकले जाते.

त्याचप्रमाणे, अगरबत्तीच्या काड्या बनविण्यासाठी वापरला जाणारा बांबूचा एक विशेष प्रकार, बांबुसा तुलदा, हा आसाम वरून आणला असून, स्थानिक अगरबत्ती उद्योगाला चालना मिळावी आणि प्रशिक्षण केंद्राला नियमित उत्पन्न मिळावे या उद्देशाने महाराष्ट्रात या बांबूची लागवड करण्यात आली आहे.

तिसऱ्या वर्षापासून बांबूपासून उत्पन्न मिळायला सुरुवात होते. सुमारे 25 किलो वजनाच्या बांबूचा प्रत्येक लॉग (पेर) सरासरी 5 रुपये किलोने विकला जातो. या दराने, पूर्ण तयार झालेल्या एका बांबूपासून सुमारे 125 रुपये मिळतात. बांबूच्या रोपाची विशिष्ट गुणवत्ता आहे. प्रत्येक बांबूला तीन वर्षानंतर किमान 5 पेरे तयार होतात आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी बांबू पेराचे उत्पादन दुप्पट होते. म्हणजेच, 500 बांबूच्या रोपांपासून तिसऱ्या वर्षी किमान 2500 बांबू पेरे मिळतील आणि संस्थेला जवळपास 3.25 लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होईल आणि ज्यात प्रत्येक वर्षी अंदाजे दुप्पट वाढ होईल.

याशिवाय, जर वजनात बोलायचे झाले तर 2500 बांबूच्या लॉगचे वजन सुमारे 65 मेट्रिक टन भरेल, ज्याचा उपयोग अगरबत्तीच्या काड्या बनवण्यासाठी केला जाईल आणि मोठ्या प्रमाणात स्थानिक रोजगार निर्माण होईल.

गेल्या काही महिन्यांत केव्हीआयसीने भारताच्या विविध भागात बांबूसा तुलदा जातीच्या बांबूची सुमारे 2500 रोपे लावली आहेत. अगरबत्ती उत्पादकांना किफायतशीर दराने कच्च्या मालाची स्थानिक उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी नाशिकमध्ये नुकतीच केलेली बांबूची लागवड वगळता दिल्ली, वाराणसी आणि कन्नौज या शहरांमध्ये बांबूसा तुलदा जातीच्या बांबूची 500 रोपे लावण्यात आली आहेत.

 “मालमत्तेच्या मुद्रीकरणाच्या उद्देशाने रिकाम्या जागेवर चंदन आणि बांबूची झाडे लावण्यात आली आहेत. त्याचबरोबर, चंदनाची जागतिक मागणी पूर्ण करणे आणि केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ च्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बांबूच्या लागवडीतून स्थानिक अगरबत्ती उत्पादकांना पाठबळ प्रदान करणे हा दुहेरी हेतू साध्य होईल,” असे केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना म्हणाले. “आम्ही देशभरात केव्हीआयसीच्या मालकीच्या अशा आणखी जागा शोधत आहोत जिथे असे वृक्षारोपण सुरू केले जाऊ शकते, असे सक्सेना म्हणाले, जर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात चंदनाची फक्त दोन झाडे लावायला सुरुवात केली तर कोणत्याही परिस्थितीची सामना करण्यासाठी ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील.

निर्यात बाजारपेठेत चंदन वृक्ष लागवडीला खूप मोठी मागणी आहे. चीन, जपान, तैवान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यासारख्या देशांमध्ये चंदन व त्याच्या तेलाला मोठी मागणी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com