भारत-चीनमध्ये सैन्य माघारीवर एकमत; सैन्य स्तरावरील बैठकीच्या अकराव्या फेरीत निर्णय

India and China
India and China

भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्यात मागील वर्षाच्या जून महिन्यात मोठा संघर्ष झाला होता. या संघर्षानंतर दोन्ही देशांनी आपापले सैन्य मोठ्या प्रमाणावर सीमारेषेवर आणून उभे केले होते. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच तणावपूर्ण झाले होते. यानंतर हा तणाव कमी करण्यासाठी म्हणून भारत आणि चीन यांच्यात एकमत होऊन अनेक चर्चा पार पडल्या होत्या. यातील कोर कमांडर स्तरावरील चर्चेच्या 11 व्या फेरीमध्ये पूर्व लद्दाख सेक्टरमधील उर्वरित संघर्षाच्या ठिकाणांवरून सैन्य मागे घेण्याबाबत यशस्वी बोलणी झाली असल्याचे संरक्षण मंत्रालयाने आज म्हटले आहे. (Eleventh round of Indo-China military level done) 

भारतीय संरक्षण मंत्रालयाने आज दिलेल्या निवेदनात, दोन्ही देशांमधील विद्यमान करार आणि प्रोटोकॉलच्या अनुषंगाने उर्वरित प्रश्न त्वरित सोडविण्याची गरज असून यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, संघर्षाच्या क्षेत्रातून दोन्ही बाजूनी सैन्य मागे घेतल्यानंतर संपूर्ण सीमारेषेवरील दोन्ही देशांचे सैन्य कमी करण्याच्या दिशेने सुकर मार्ग निर्माण होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने आज जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यासोबतच शांतता व द्विपक्षीय संबंधात प्रगती होण्यास मदत मिळणार असल्याचे मंत्रालयाने नमूद केले आहे. 

भारत (India) आणि चीन (China) हे लडाख मधील गोगरा हाइट्स, हॉट स्प्रिंग्ज आणि देपसांग येथील संघर्ष ठिकाणांहून दोन्ही बाजूंचे सैन्य मागे घेण्याच्या बाबत चर्चा करीत आहेत. पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) सैन्य माघारी घेण्यासंबंधित उर्वरित मुद्द्यांचा निपटारा करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात विस्तृत चर्चा झाली असल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. भारत आणि चीन यांच्यातील सैन्य पातळीवरील कोर कमांडर स्तरावरील अकराव्या बैठकीची चर्चा 9 एप्रिल 2021 चुशुल-मोल्दो या ठिकाणी झाली.   

दरम्यान, यापूर्वी सहा नोव्हेंबर रोजी दोन्ही देशांमधील चर्चेची आठवी फेरी झाली होती. आणि या चर्चेत देखील दोन्ही बाजूंनी संघर्षाच्या ठिकाणांवरून सैन्य मागे घेण्यावर व्यापक चर्चा केली होती. तर, आतापर्यंत झालेल्या चर्चेत भारताने सीमेवरील तणाव कमी करण्यासाठीची जबाबदारी चीनवर असल्याचे म्हटले होते. याउलट, सातव्या फेरीच्या चर्चेत चीनने पॅंगॉन्ग त्सो तलावाच्या दक्षिणेकडील किनाऱ्याच्या शिखरावरुन आधी भारताने सैन्य मागे घेण्यास म्हटले होते. पण यावर दोन्ही बाजुंनी एकाच वेळी सैन्य माघारी घेण्यासंबंधी भारताने चीनला ठणकावून सांगितले होते. त्यानंतर, नवव्या फेरीत दोन्ही देशांनी यावर सहमत होत सैन्य माघार घेण्यास सुरवात केली होती. मात्र पॅंगॉन्ग त्सो भागातील सैन्य मागे घेण्यात आले असले तरी, काही ठिकाणी चिनी सैन्याने प्रत्यक्ष सीमारेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला आहे. लडाखच्या पूर्व भागातील देपसांग, राकी-नाला आणि डीबीओसारख्या इतर ठिकाणी भारत आणि चीनचे सैन्य अजूनही समोरासमोर उभे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com