भारतीय रेल्वेने तंत्रज्ञ भरती यशस्वीरित्या केली पूर्ण.

Indian Railways successfully completes recruitment of technicians
Indian Railways successfully completes recruitment of technicians

नवी दिल्ली,

रेल्वे मंत्रालयाने सुरक्षा आणि परिचालनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण पदे भरण्याची प्रक्रिया, जी जगातील सर्वात मोठी भरती प्रक्रीया आहे, ती यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. सहाय्यक लोको पायलट (एएलपी) व तंत्रज्ञांच्या एकूण 64,371 संयुक्त रिक्त जागांसाठी रेल्वे भरती मंडळाने (आरआरबी) 03.02.2018 ते 31.03.2018 पर्यंत केंद्रीयकृत रोजगार अधिसूचना (सीईएन) क्रमांक 01/2018 द्वारे ऑनलाईन अर्ज मागविले होते. एकूण 47,45,176 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. निवड योजनेत वैद्यकीय तपासणी (लोको पायलट पदासाठी आवश्यक असलेल्या दूरस्थ दृष्टी / रंग दृष्टी आणि सतर्कतेच्या पातळीचा विचार करता ही कठोर वैद्यकीय चाचणी आहे) आणि निवड केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीनंतर 3-स्तरीय संगणक आधारित चाचण्यांचा समावेश आहे. या पदांसाठी सुमारे 47.45 लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती.

पॅनेलने, 64,371 रिक्त पदांपैकी (26,968 एएलपी आणि 28,410 तंत्रज्ञ) 56,378 उमेदवारांच्या निवडीला (27,795 एएलपी आणि 64,371 तंत्रज्ञ) मंजुरी दिली. 40,420 उमेदवारांना (22223 एएलपी, 18197 तंत्रज्ञ) नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. कोविड लॉकडाउन संबंधित उपाययोजना सुलभ झाल्यावर नव्याने भरती झालेल्या 19,120 उमेदवारांचे (10,123 सहाय्यक लोको पायलट (एएलपी) आणि 8,997 तंत्रज्ञ) प्रशिक्षण पुन्हा सुरू करणार. एएलपीसाठी 17 आठवडे, तर तंत्रज्ञांना प्रशिक्षण कालावधी पूर्ण करण्यासाठी 06 महिने लागतील.

लॉकडाउनपूर्वी उमेदवारांना कामावर रुजू होण्यासाठीची पत्रे (जॉइनिंग लेटर्स) देण्यात आली होती परंतु कोरोना उद्रेक आणि लॉकडाऊनमुळे काही उमेदवार कामावर रुजू होऊ शकले नाहीत.

नव्याने भरती झालेल्या सर्व कर्मचार्‍यांना टप्प्याटप्प्याने नियोजित प्रक्रियेनुसार रेल्वेमध्ये नियुक्त केले जाईल. नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे कारण रेल्वे एक कार्यरत विभाग आहे आणि रेल्वेच्या कामकाजाची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची आहे. प्रशिक्षणात वर्ग प्रशिक्षण, त्यानंतर क्षेत्र प्रशिक्षण आणि त्यानंतर कार्यरत पदावर तैनात करण्यापूर्वी योग्यता चाचणीचा समावेश आहे. वर्ग, वसतीगृह, वाचनालय, शिक्षक, इत्यादींच्या क्षमतेच्या मर्यादा लक्षात घेऊन तुकडीनुसार प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण संसाधनांचा अधिकाधिक उपयोग करून हे टप्प्याटप्प्याने करावे लागेल.

कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे, शारीरिक अंतरांचे नियम पाळण्यासाठी आणि साथीच्या आजारांना नियंत्रित ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रशिक्षण तहकूब केले आहे. परिस्थिती मध्ये सुधारणा झाल्यावर प्रशिक्षण पुन्हा सुरु केले जाईल.

ही भरती प्रक्रिया तीन टप्प्यांवर करण्यात आली होती.  पहिल्या टप्प्यात संगणक आधारित चाचणी 09.08.2018 ते 04.09.2018 या 11 दिवसांत 33 शिफ्टसमध्ये यशस्वीरित्या घेण्यात आली, ज्यामध्ये जवळपास 77% म्हणजेच 36 लाखांहून अधिक उमेदवार पहिल्या टप्प्याच्या परीक्षेला बसले होते. 21.01.2019 ते 23.01.2019 या तीन दिवसांत 13,00,869 (13 लाखाहून अधिक) उमेदवारांसाठी दुसर्‍या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली. लोको पायलट पदासाठी आवश्यक असलेल्या सतर्कतेचे मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (सीबीएटी) 10.05.2019 आणि 21.05.2019 या कालावधीत यशस्वीपणे घेण्यात आली.

यापूर्वी विभागीय रेल्वेने घेतलेल्या सर्व पदांच्या वैद्यकीय तपासणीची जबाबदारी आरआरबीला सोपविण्यात आली होती. त्यानुसार, सुमारे 90,000 उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी (50% राखीव उमेदवारांसह) 16.06.2019 पासून 20.08.2019 पर्यंत सुरू झाली. आधीच सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय तपासणी ही या उद्योगातील एक महत्वपूर्ण गोष्ट आहे कारण रेल्वे चालविणार्‍या लोको पायलटमध्ये कोणतीही त्रुटी असता कामा नये.

विभागीय रेल्वेला सप्टेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 पर्यंत पॅनेल पुरविण्यात आले. एएलपी आणि तंत्रज्ञ अशा दोघांसाठी सीबीटी समान असल्याने तंत्रज्ञ परीक्षेचा निकाल संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (सीबीएटी) मध्ये एएलपीसाठी पात्र होऊ न शकणाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आला.

एएलपी आणि तंत्रज्ञांच्या भरतीबरोबरच, रेल्वे भरती मंडळाने (आरआरबी) बिगैर-तांत्रिक लोकप्रिय श्रेणी (एनटीपीसी - पदवीधर आणि पदवीधर स्तराच्या) पदांच्या एकूण 35,208 संयुक्त रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. एकूण 1,26,30,885 (म्हणजेच 1.25 कोटींपेक्षा जास्त) ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.

पूर्व कोविड परिस्थिती दरम्यान परीक्षा प्रक्रिया तयारी प्रगत टप्प्यावर होती. तथापि, कोविड-19 साथीच्या आजाराच्या उद्रेकामुळे या प्रक्रियेमध्ये व्यत्यय आला. परिस्थिती निवळल्या नंतर भारतीय रेल्वे भरती प्रक्रिया वेगवान करणार आहे.

सद्य परिस्थितीत नवीन प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्याची आवश्यकता आहे जे कोविड साथीच्या आजाराच्या आधीच्या परिस्थितीत अनपेक्षित होते. उमेदवारांना चेहऱ्यावर मास्क घालावा लागेल; ज्यामुळे पुन्हा एकदा तोतयागिरीचे आव्हान उभे ठाकले आहे; परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होऊ शकते; प्रत्येक पाळी/शिफ्ट नंतर परीक्षा केंद्रांचे निर्जंतुकीकरण; या परिस्थिती मध्ये निष्पक्ष आणि सहजपणे परीक्षा घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियमांचे पालन करताना दोन उमेदवारांमध्ये जास्तीत जास्त शारीरिक अंतर राखता यावे यासाठी परीक्षा केंद्रातील उमेदवारांची संख्या कमी करावी लागेल, अशी आव्हाने आहेत.

कोविड-19 परिस्थितीतील सर्व मानदंडांचे निरीक्षण करताना भारतीय रेल्वे 1.25 कोटी अर्जदारांची मोठ्या प्रमाणात तपासणी करणे आणि सर्व प्रक्रियेचे वेळापत्रक ठरविणे यासाठी कार्यक्षम धोरण आखत आहे.

आरआरबी जेंव्हा आवश्यक असेल तेंव्हा संकेतस्थळ आणि वैयक्तिक एसएमएस आणि ई-मेलवरील नियमित अद्ययावत माहिती द्वारे उमेदवारांशी थेट आणि त्वरित संवाद साधण्याच्या पद्धतीचा अवलंब करत आहे. उमेदवारांना केवळ या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा आणि सोशल मीडियावर पसरल्या जाणार्‍या खोट्या प्रचार आणि अफवांवर विश्वास ठेवून स्वतःची दिशाभूल करून घेऊ नये असे आवाहन केले आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com