राहुल गांधींचा हल्लाबोल; अर्थसंकल्प, शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर डागली तोफ

Copy of Gomantak Banner  - 2021-02-03T165037.056.jpg
Copy of Gomantak Banner - 2021-02-03T165037.056.jpg

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर चांगलीच टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत देशाच्या अर्थव्यवस्थेपासून शेतकरी आंदोलनाबाबत भाष्य करत सरकारवर तोफ डागली. याशिवाय सरकारच्या शेतकरी आंदोलनाबाबतच्या भूमिकेवरून राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. 

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायदा आणि शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना, शेतकऱ्यांमुळेच देशाचा उदरनिर्वाह होतो. मात्र सध्या देशाची राजधानी दिल्ली शेतकऱ्यांनी वेढली असल्याचे सांगितले. आणि दिल्लीचे रूपांतर छावणीमध्ये का झाले असल्याचा प्रश्न राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. तसेच आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना सरकार धमकी, मारहाण का करत आहे, असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. त्यानंतर सरकारने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधने बंद केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळेस केला. आणि शेतकऱ्यांची व कृषी आंदोलनाची समस्या देशासाठी चांगली नसल्याचे म्हणत, या समस्येचे निराकरण लवकरात लवकर करणे गरजेचे असल्याचे मत काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी यावेळेस व्यक्त केले. 

त्यानंतर, वादग्रस्त कृषी कायद्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन कृषी विधेयक पुढील दोन वर्षांसाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव अजूनही टेबलावर असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी केलेल्या या वक्तव्याचा नेमका अर्थ कोणता असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. व एकतर पंतप्रधानांना हा कायदा मागे घ्यायचा आहे, किंवा याबाबत एकही पाऊल मागे घेण्याची इच्छा नसल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी केला. त्यामुळे पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे म्हणणे एकूण घेऊन यावर तोडगा काढणे गरजेचे असल्याचे राहुल गांधी यांनी पुन्हा नमूद केले. 

याशिवाय, अर्थसंकल्पावरून राहुल गांधी यांनी जोरदार निशाणा साधला. सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात अवलंबलेल्या खासगीकरणाच्या धोरणामुळे देशाचा फायदा न होता काही ठराविक लोकांचेच हित साधणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. आणि भारताने आपला पैसा आपल्या लोकांच्याच हातात ठेवणे गरजेचे असल्याचे राहुल गांधी यांनी पुढे म्हटले आहे. नोटबंदी, जीएसटी आणि कोरोनाच्या धक्क्यानंतर देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी बाजारातील मागणी वाढविणे महत्वाचे असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळेस अधोरेखित केले. व पुरवठा वाढवून ही गोष्ट सिद्ध होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

याव्यतिरिक्त, यंदाच्या अर्थसंकल्पातून सरकार देशातील 99 टक्के जनतेला मदत करेल, अशी अपेक्षा आपण व्यक्त केल्याचे राहुल गांधी म्हणाले. मात्र याउलट सरकारने बजेट मधून केवळ 1 टक्के जनतेची मदत केली असल्याचा त्यांनी सांगितले. तसेच अर्थसंकल्पातून सरकारने लघू आणि मध्यम उद्योगातील लोक, कामगार, शेतकरी आणि सैन्य यांच्या हातातील पैसा हिसकावून घेत तो 5 ते 10 लोकांच्या हातात दिल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. इतकेच नाही तर, चीनने भारताच्या भूमीत घुसखोरी केलेली असून, सरकारने संरक्षणाच्या अर्थसंकल्पात फक्त 3000-4000 कोटी रुपयांची वाढ करून नेमका कोणता संदेश दिला असल्याचे राहुल गांधी म्हणाले.      

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com