दाबोळी: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी स्वतःहून स्वच्छता मोहीम पुढे नेऊन एका प्रकारे देशात क्रांती निर्माण केली आहे. "स्वच्छ भारत मिशन" ग्रामीण भागात राबवून सामान्य जनतेला न्याय दिला आहे. गोव्यातील (Goa) 60 पंचायतींना स्वच्छ भारत मिशन ग्रामीण भाग दोन मधून 140 कोटी अर्थसहाय्या बरोबर पंचायत पंधराव्या वित्त निधीमधून आणखीन 75 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यात राज्य सरकारबरोबर केंद्र सरकारचा महत्त्वाचा वाटा असल्याची माहिती आमदार तथा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो (Mavin Gudinho) यांनी दिली.
राज्य सरकारच्या आजादी का अमृतमहोत्सव स्वच्छ भारत मिशन ग्रामीण भाग 2 कार्यक्रमाचे आयोजन चिखली पंचायत सभागृहात करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत मंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते.तसेच पंचायत संचालिका श्रीमती सिद्धी हळर्णकर, मुरगावचे गटविकास अधिकारी प्रसिद्ध नाईक, चिखली पंचायतीचे सेबेस्ताव परेरा, सांकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर, कुठ्ठाळीच्या सरपंच श्रीमती सेनिया परेरा, कासावली सरपंच फेबिना साल्ढाणा, वेर्णा सरपंच लॉरेन फर्नांडिस, बोगमाळोचे सरपंच लोरीना डिक्रुझ, मार्जोडा सरपंच सॅमसन गोन्साल्विस, वेलसाव सरपंच हेन्री डिमेलो व इतर पंच सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य उपस्थित होते.
पुढे बोलताना पंचायत मंत्री म्हणाले की राज्यातील सर्व तालुक्यातील पंचायतींना घेऊन गट विकास अधिकाऱ्यांनी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण भाग 2 मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. सर्व पंचायतींना स्वच्छता मोहिमेसाठी आणखी निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील पंचायत सचिवांची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याने दररोज माझ्याकडे पंच सदस्यांच्या तक्रारी यायच्या, यावर अखेर राज्य सरकारने तोडगा काढून नवीन 36 पंचायत सचिवांची भरती केली. यात आणखी 15 पंचायत सचिवा बरोबर प्रथमच राज्यातील पंचायतींना तांत्रिकरित्या मजबूत करण्यासाठी 10 अभियंत्यांची भरती करण्यात येईल अशी माहिती शेवटी मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
यावेळी मुरगाव तालुक्यातील सांकवाळ पंचायतीचे सरपंच रमाकांत बोरकर यांनी सांगितले की देशात पंतप्रधान मोदी याने स्वच्छ भारत अभियान राबवून जनजागृती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. यात त्यांना गोवा सरकारचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. राज्याचे पंचायतमंत्री गुदिन्हो यांनी पंचायतीतील कचरा विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घेतल्याने अनेक पंचायतीने नेत्यांच्या मोहिमेचे स्वागत केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून करण्यात आले. सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक मुरगावचे गटविकास अधिकारी प्रसिद्ध नाईक यांनी केले. यावेळी उपस्थित असलेल्यांना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत याने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवेश आमोणकर तर आभार प्रदर्शन चिखलीचे पंच रॉबर्ट फाल्काव यांनी केले.शेवटी पंचायत सदस्या मार्फत नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.