्बाबूराव रेवणकर
मुरगाव :
खवळलेल्या समुद्रामुळे बायणा किनाऱ्यावरील वाळू मोठ्या प्रमाणात पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने झुआरी कंपनीची अतिज्वालाग्राही नाफ्तावाहिनी ‘डेंजर झोन’मध्ये सापडली आहे. यामुळे बायणा भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुरगाव बंदरातून नाफ्तावाहिनी बायणा समुद्र किनाऱ्यावरून गांधीनगर, वरुणापुरी मार्गे झुआरीनगरपर्यंत झुआरी खत प्रकल्पाकडे गेली आहे. या वाहिनीचा एका तपापूर्वी वरुणापुरी येथे भडका उडून निष्पाप लोकांचे जीव गेले होते. ही घटना वास्कोवासीयांच्या मनात अजूनही ताजी असतानाच आता बायणा समुद्रकिनाऱ्यावरील वाळू वाहून गेल्याने उघड्यावर आहे.
वास्को परिसरात इंधन टाक्या, अमोनिया प्रकल्प, कोळसा प्रकल्प हे ‘भडका’ उडविणारे प्रकल्प आहेत. सध्या वास्कोतील जनता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्रस्त असतानाच नाफ्ता वाहिनीच्या रुपाने नवीन संकट वास्कोवासीयांसमोर उभे ठाकले आहे.
लाटांच्या तडाख्यांमुळे फुटू शकते?
बायणा किनाऱ्यावरील वाळूतून गेलेली वाहिनी वाळू वाहून गेल्याने उघडी पडली आहे. ती लाटांच्या तडाख्याने भंग होऊन समुद्रात वाहून जाण्याचीही भीती निर्माण झाली आहे. असे घडल्यास मोठा हाहाकार माजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाफ्ता हा अतिज्वालाग्राही पदार्थ आहे. या द्रव पदार्थाचा भडका उडाल्यास प्राणहानी उद्भवू शकते, याचा अनुभव वास्कोतील जनतेने घेतला आहे. या वाहिनीच्या अगदी पन्नास मीटर अंतरावर काटे बायणातील लोकांची वस्ती आहे. त्यामुळे भीती अधिक गडद झाली आहे.
या वाहिनीला धोका पोहोचू नये म्हणून संरक्षक खांब समुद्रात रोवून वाहिनीचे तात्पुरते रक्षण केले आहे.
- महेश तांडेल
|