कृषी संस्कृतीचे प्रतीक ‘घोंगडी’चे महत्त्व होतेय कमी

काणकोण ः घोंगडीचे आजही महत्त्व जाणणारा पोळे येथील युवा शेतकरी प्रेमानंद बांदेकर. (एस. महाले)
काणकोण ः घोंगडीचे आजही महत्त्व जाणणारा पोळे येथील युवा शेतकरी प्रेमानंद बांदेकर. (एस. महाले)

काणकोण
‘‘निळ्या नभाच्या छताखाली, आम्ही हिंडतो रानोरानी... धरणी माय-माऊली आमची, करी माय लेकरांवरी... या भारत देशात परी विसरूनी सारे भेद, गर्जतो आम्ही सारे शेतकरी बांधव... घेऊनी आम्ही खांद्यावरी घोंगडी, आजही राखले कृषी संस्कृतीचे हे प्रतीक...’’ हे बोल आहेत पोळे येथील युवा शेतकऱ्याचे. कृषी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या व पूर्वापार आधार बनून राहिलेल्या घोंगडीचे आज महत्त्व कमी होत असले तरी पोळेतील प्रेमानंद बांदेकर हे युवा शेतकरी आजही घोंगडीचा वापर करीत आहेत. 
घोंगडी हे कृषी संस्कृतीचे प्रतिक काळाच्या पडद्याआड होत आहे. पावसाळ्यात पावसापासून संरक्षण व हिवाळ्यात ऊब देणारी कांबळ(घोंगडी) ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात दिसायच्या. कुणाच्या घरी एक-दोन किंवा त्यापेक्षाही अधिक संख्या असायची. ऊब देणारी व निसर्गाला धरून विणली गेलेली घोंगडी ही भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. एकदा घेतलेली घोंगडी चार-पाच वर्षे बिनदिक्कत वापरता येते. दिवसभर पावसात कांबळ घेऊन शेतात काम केल्यानंतर रात्रीच्यावेळी घरात पेटविलेल्या शेकोटीवरती ही घोंगडी वाळलेली जात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ती वापरायला तयार होत होती. हिवाळ्यात अति कडक्याच्या थंडीत हीच घोंगडी पांघरण्यासाठी वापरली जात असे. शरीराला उपयुक्त असलेल्या या घोंगडीची जागा आदा प्लास्टिक ताडपत्रीने घेतली आहे. 
घोंघडीचे दर प्रती नग पाचशे रुपयांपेक्षा जास्त आहे. पावसापासून संरक्षण करण्यासाठी शंभर रुपयांना प्लास्टिक ताडपत्रीने काम भागत असल्याने शेतकऱ्यांनी या महागड्या घोंगडीकडे पाठ फिरवली आहे. पण, किमान पाच ते सहा वर्षे टिकणारी ही घोंगडी व त्याचा रुबाब पाहता प्लास्टिकच्या ताडपत्रीपेक्षा कैकपटीने चांगले असल्याचे मत, पैंगीण येथील शेतकरी नारायण गोसावी यांनी सांगितले. ग्रामीण भागात आजही काही शेतकरीबांधव आजही घोंघडीचा वापर करीत आहेत. 

जुनं तेच सोनं... 
आधुनिकतेची कास धरताना जुन्या गोष्टींचा विसर आजच्या घडीला पडलेला आहे. परंतु या पारंपरिक वस्तूंचा वापर व जतन होणे गरजेचे आहे. रानोमाळात गुरे चारणाऱ्या गुराख्यांची ही घोंगडी सोबती होती, पण आज गुराखी हा प्रकारच नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने घोंगडीचे महत्त्व सध्या कमी होऊ लागले आहे. शेवटी वर्षानुवर्षे टिकणारी घोंगडी ही ‘जुनं तेच सोनं...’ ठरतात. म्हणूनच धनगरबांधव आजही घोंगड्याचा मनोभावे वापर करत असल्याने ही जमेची बाजू ठरत आहे.

संपादन ः संदीप कांबळे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com