वीज तक्रार क्रमांक व्यस्त असल्याने लोक हैराण

electricity
electricity

पणजी

राज्यातील वीज समस्येच्या तक्रारी नोदणी करण्यासाठी वीज खात्याने तक्रार निवारणसाठी १९१२ हा क्रमांक जाहीर केला असला तरी तो वारंवार व्यस्त असल्याने वीज ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या क्रमांकासाठी अनेक लाईन्स असल्या तरी ग्राहकांना तक्रार नोंदवण्यासाठी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नाही. फोन व्यस्त असल्याचा संदेश दिला जातो त्यामुळे या व्यवस्थेत सुधारणा करण्यात यावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
वीज खात्याने सर्व वीज विभागासाठी एकमेव तक्रार निवारण क्रमांक १९१२ निश्‍चित केला आहे. राज्यातील कोणत्याही भागातून वीज ग्राहकाने तक्रार करायची असल्यास या क्रमांकावरच फोन करून संपर्क साधावा लागतो. वारंवार फोन करूनही प्रत्येकवेळी हा क्रमांक व्यस्त असल्याचा मेसेज येतो. मॉन्सून गोव्यात येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. पावसाळ्यात वीज तारांवर झाडे तसेच फांद्या पडून वीज खंडित होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात वीज ग्राहकांकडून फोन केले जातात. पूर्वी प्रत्येक वीज विभागाकडे वेगळा तक्रार निवारण क्रमांक असायचा त्यामुळे तक्रारी करण्यास सोपे होत आहे. तक्रार केल्यावर संबंधित विभागातील कर्मचारी वीज खांबावरील दुरुस्ती करत होते मात्र वीज खात्याने तक्रार निवारणसाठी एकच क्रमांक सर्व वीज विभागांसाठी केल्याने वीज ग्राहकांना मुष्किलीचे बनले आहे. वेळेवर तक्रार देणे शक्य होत नसल्याने लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही वीज विभागातील कर्मचारी तक्रारी नोंदविण्यास असलेला फोन जाणुनबुजून बंद ठेवतात अशा तक्रारी वीज ग्राहकांकडून येत होत्या त्यामुळे वीज खात्याने तक्रार निवारणसाठी एकमेव क्रमांक १९१२ सुरू केला. मात्र या क्रमांकावर एकाचवेळी अनेक फोन येत असल्याने ग्राहकांना तक्रार नोंदविण्यास पंधरा ते अर्धा तास संपर्क होईपर्यंत वारंवार फोन करण्याची पाळी येत आहे.
या संदर्भात वीज खात्याच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्याने सांगितले की, तक्रार निवारण कक्षाकडे सर्व तक्रारी नोंद केल्या जातात व त्यानंतर त्या त्या संबंधित क्षेत्रातील वीज विभागाला माहिती दिली जाते. काही भागात असलेली उपकरणे जुनी आहेत व ती नादुरुस्त होतात. ही उपकरणे बदलण्यासाठी वीज खात्याकडे कित्येक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत मात्र त्याची दखलच घेतली जात नाही. वीज ग्राहक १९१२ या क्रमांकावर संपर्क साधतात मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने ते थेट वीज विभागात येऊन या फोनच्या सुविधेसंदर्भात संताप व्यक्त करतात.

भेडसावणारा प्रश्न त्वरित सोडवा...
राज्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड होत असल्याने वीज उपकरणे नादुरुस्त तसेच वीज वाहन्या तुटून पडण्याचे प्रकार हे घडतात. अनेक भागामध्ये कित्येक वर्षापूर्वीचे जुने फिडर तसेच कमी क्षमता असलेले ट्रान्स्फॉर्मर आहेत त्यामुळे ते दुरुस्त करण्याचे काम वारंवार वीज कर्मचाऱ्यांकडून केले जाते. सांताक्रुझ या परिसरात विजेचा लपंडाव गेल्या कित्येक वर्षापासूनच सुरू आहे. या भागाला वीजपुरवठा करणारे फिडर खूप जुने असल्याने वादळीपावसामुळे ते वारंवार नादुरुस्त होतात. ते दुरुस्त करण्यासाठी तासनतास वेळ लागतो. त्यामुळे लोकांना वीजपुरवठा पुन्हा कधी सुरळीत होईल याचा नेम नसतो. वीजपुरवठा कधी सुरळीत होईल याची विचारपूस कोठे करायची असा प्रश्‍न वीज ग्राहकांना पडतो. सांताक्रुझ मतदारसंघातील आमदारांना विजेच्या या लंपडावबाबत माहीत आहे त्यामुळे त्यांनी वीजमंत्र्यांकडे यासंदर्भात चर्चा करून वीज ग्राहकांना भेडसावणारा हा प्रश्‍न त्वरित सोडवावा. ही समस्या राज्यातील बहुतेक भागातील आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com