पणजी
पाण्याखालील जाण्याचे संकट स्थानिकांना जाणवू लागले आहेत. गेल्या तीन चार दिवसांत झालेल्या पावसामुळे या शेतजमिनीचे तळ्यात रूपांतर झाले आहे. सखल भागात असलेली शेतजमीन कशी वाचवायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जुने व कमकुवत बांध हा करमळीच्या शेतकऱ्यांसाठी नवा प्रश्न नाही. मात्र, आता बांधांना भगदाडे पडू लागल्याने ते सारे घाबरले आहेत. खारे पाणी शेतात घुसून जमीन नापिक होण्याचा प्रकार त्यांनी याआधीही अनुभवलेला आहे.
पोर्केभाट - करमळी येथील संजय नाईक यांचे त्या भागात शेत आहे. ते म्हणाले, शेती तर बुडाली आहेच, पण पाण्याचा प्रवाह पावसात वाढला तर आम्हीच वाहून जाण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी खारे पाणी शेतात शिरल्याने खारफुटीने शेते व्यापली आहेत. आता बांधाला भगदाड पडल्याने शेताचे रूपांतर कायमचे तळ्यात होण्याची वेळ आली आहे.
‘मानशेर’ या भागात दहा घरे एका चिंचोळ्या भागात आहेत. पाण्याची वाढती पातळी हे त्यांना धडकी भरवणारे ठरत आहे. पोर्के भाटात पन्नासेक घरे आहेत. हा सारा भाग सखल असल्याने पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढून घरांपर्यंत पाणी पोचू शकते अशी शक्यता तेथील रहिवाशांना वाटत आहे. तेथील पंच राजेश नाईक यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, बांधांची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे यंदा पाण्याच्या प्रवाहाचा फटका बसू शकतो अशी स्थानिकांना भीती वाटत आहे. बुडीत क्षेत्र वाढत आहे याची चिंता सगळ्यांनाच आहे. या बांधाच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आली होती. मात्र, त्यानंतरच्या कार्यवाहीसाठी फाईल सरकारकडे आहे.
खोर्ली येथील खाजन जमिनीला राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी कोविड टाळेबंदीच्या आधी भेट दिली होती. त्यावेळी करमळीच्या शेतकऱ्यांना एकंदर परिस्थितीची कल्पना दिली होती. त्यामुळे आता ते यातून मार्ग काढतील अशी त्यांना अपेक्षा आहे.
दोन हजार हेक्टर शेतजमीन बुडण्याची भीती
गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसात गुड्डीर पंच मानस बांधाचा सुमारे २ किलोमीटरचा भाग पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला आहे. यामुळे सखल भागातील शेतांत पाणी घुसले असून ते वस्तीपर्यंत शिरण्याचा धोका आहे. आगशी ते करमळी ते गवंडाळीपर्यंतची ही सर्वात मोठी खाजन शेती आहे. सुमारे दोन हजार हेक्टर सुपीक अशी ही शेतजमीन बुडण्याची भीती आहे. दोमजो हा मुख्य बांध डोंगुर्ली ते करमळी असा आहे. त्यालाही भगदाडे पडू लागल्याने आता शेती हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.
Goa Goa Goa Goa
|