Food Processing Industry: ...तर अन्नप्रक्रिया उद्योग संकटात येण्‍याची भीती!

म्हादई नदीच्‍या प्रवाहात बदल केल्यास राज्यातील अन्नप्रक्रिया उद्योगांतील सुमारे 25 हजार कोटींची उलाढाल ठप्प होईल, असे उद्योग व कौशल्‍य विकासमंत्री माविन गुदिन्हो यांनी म्हटले आहे.
Food Processing Industry
Food Processing IndustryDainik Gomantak

Food Processing Industry: म्हादई नदीच्‍या प्रवाहात बदल केल्यास राज्यातील अन्नप्रक्रिया उद्योगांतील सुमारे 25 हजार कोटींची उलाढाल ठप्प होईल, असा गंभीर इशारा उद्योग व कौशल्‍य विकासमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिला. कर्नाटकात मे महिन्‍यात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्‍यामुळे तेथील नेते ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वक्तव्य करत आहेत, असेही ते म्हणाले.

राज्यात अन्नप्रक्रिया उद्योग वाढावा यासाठी असोसिएट चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्‍ड इंडस्ट्रीतर्फे (असोचॅम) एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्‍

याचे उद्‌घाटन केल्‍यानंतर गुदिन्‍हो बोलत होते. यावेळी कृषी खात्याचे सचिव ए. के. मिश्रा, नाबार्डचे सरव्यवस्थापक मिलिंद भिरुड, असोचॅमचे गोवा कौन्सिल अध्यक्ष मांगिरीश पै रायकर, डॉ. सागर साळगावकर, विपुल गजिंगवार, दर्शना कोसंबे, अन्नप्रक्रिया उद्योगातील केंद्र सरकारचे अधिकारी तसेच राज्यातील सुमारे 200 उद्योजक उपस्थित होते.

Food Processing Industry
Goa Mining : आणखीन पाच खनिज पट्टे लिलावासाठी खुले होणार

भविष्यात पाण्यासाठी युद्धे लढली जातील आणि म्हादई त्याची सुरवात आहे. म्हादई नदी गोव्याच्या कृषी आणि उद्योग क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्‍वाची आहे. त्यामुळे म्‍हादईच्‍या रक्षणासाठी आमचा लढा सुरूच राहील. राज्‍यात जवळपास 60 अन्नप्रक्रिया उद्योग आहेत.

या उद्योगांची वार्षिक उलाढाल सुमारे 25 हजार कोटी इतकी आहे. जर म्हादईचे पाणी अन्यत्र वळविले तर या उद्योगांना मोठा फटका बसेल. म्हादई वाहते म्हणून गोव्याची भूमी सोन्याची आहे. म्हादई नसेल तर ती कोरडी होईल, असेही गुदिन्हो म्हणाले.

...म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री बरळतात

कर्नाटकात मे महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे तेथील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई मतदारांना भुलविण्यासाठी खोट्या थापा मारत आहेत. परिणामी ते काहीही वक्तव्य करू शकतात. मात्र, त्याचा आमच्या म्हादईच्या लढ्यावर कसलाच परिणाम होणार नाही. आम्ही ही लढाई जिंकू, असा आशावाद गुदिन्हो यांनी व्यक्त केला.

निवडणुकीच्या काळात राजकीय नेते विविध प्रकारची आश्वासने देतात. ‘प्रेमात, युद्धात सारे काही माफ असते’ असे म्हटले जाते. मात्र ‘प्रेमात, युद्धात आणि निवडणुकीतही सारे काही माफ असते’ अशी सध्‍याची स्थिती आहे. त्यामुळे या काळात होणाऱ्या वक्तव्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे गुदिन्‍हो म्हणाले.

Food Processing Industry
Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाचा गोव्यात सराव

‘सुवर्णभूमी’ गोव्याचे भवितव्य धोक्यात!

गोव्याला ‘सुवर्णभूमी’ म्हणून गौरविण्यात येते. मात्र कळसा-भांडुरा प्रकल्प झाल्यास त्याचा विपरीत परिणाम येथील समाजजीवनाबरोबरच पर्यावरणावर होणार आहे. ही भूमी सुकून जाईल, अशी भीती गुदिन्हो यांनी व्यक्त केली आहे. यासाठी सर्वांनी राजकीय हेवेदावे, मतमतांतरे, वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकत्रित लढा दिला पाहिजे, असे गुदिन्‍हो म्हणाले.

लाटंबार्से येथे अन्नप्रक्रिया उद्योग पार्कचे काम सुरू

राज्यात अन्नप्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने लाटंबार्से येथे अन्नप्रक्रिया उद्योग पार्क उभारण्‍याचे काम सुरू झालेले आहे. येथे विविध उद्योगांना निमंत्रित केलेले आहे. कृषी उत्पादनांना बाजारपेठ मिळावी आणि उत्पन्नात वाढ व्‍हावी यासाठी पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे गुदिन्हो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com