पणजी
गोव्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये २ ऑक्टोबरपर्यंत सुरु न करण्याचा निर्णय सरकारने आज घेतला. २ऑक्टोबरनंतर दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्याविषयी सरकार सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज शिक्षणमंत्री या नात्याने सर्व संबंधित घटकांशी चर्चा केली त्यानंतर हा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला.
त्यांनी सांगितले, तूर्त दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास पालक, शिक्षक परस्पर सहमतीने एकावेळी मोजक्याच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी विद्यालयांत बोलवू शकतील. ३० टक्के विद्यार्थ्यांना मोबाईल कनेक्टीवीटीचा प्रश्न असल्याने त्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही. त्यांच्यावर अशा मार्गदर्शन सत्रात भर द्यावा असे सुचवण्यात आले आहे.
दरम्यान, गेले आठवडाभर राज्यभरातील शाळांनी ऑनलाईन पद्धतीने पालकांचे म्हणणे शाळा सुरु करण्याबाबत विचारात घेतले होते. त्याची मांडणी त्यांच्या प्रतिनिधींनी बैठकीत केली.