गोव्यात केलेले इन्क्विझिशन हे इतिहासाचे काळे पान!

संशोधकांचे मत: आजही तेच उगाळत बसण्यात अर्थ नाही
Goa
Goa Dainik Gomantak

मडगाव: गोव्यातील नवख्रिस्तींना वठणीवर आणण्यासाठी गोव्यात लागू केलेले इन्क्विझिशन हे गोव्यातील इतिहासाचे एक काळे पान हे जरी खरे असले, तरी सोळाव्या शतकात झालेल्या गोष्टी आता 21 व्या शतकात उगाळत बसण्यात काय अर्थ? असा सवाल इतिहास संशोधकांकडून विचारला जाऊ लागला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी राज्य प्रमुख आणि हिंदू रक्षा आघाडीचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी आपण ‘गोवा फाईल्स’ उघड करणार असे घोषित करताना गोव्यात इन्क्विझिशन आणणारे फ्रान्सिस झेवियर ‘गोयचो सायब’ होऊच शकत नाही असे वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा सुरू झाली आहे.

Goa
गोव्यात मासळी दरात वाढ

राशोल सेमिनारीचे माजी प्रमुख व ऐतिहासिक घटनावरील भाष्यकार फा. व्हिक्टर फेर्रांव यांनी सध्याच्या वादावर भाष्य करताना सांगितले, की गोव्यात इन्क्विझिशन लागू करण्याची मागणी फ्रान्सिस झेवियर यांनी केली. त्यामुळे गोव्यातील जनतेचा अतोनात छळ झाला. माझ्या स्वतःच्या पूर्वजांनासुद्धा हे त्रास सोसावे लागले. ही खरेच क्लेशदायक बाब. मात्र, सोळाव्या शतकातील झालेल्या घटना आज उकरून काढण्यात काय अर्थ आहे?

सप्त कोकणाची स्थापना प्रभू परशुराम यांनी केली. त्यामुळे तेच खरे ‘गोयचे सायब’ असेही वेलिंगकर यांनी म्हटले होते. त्याबद्दलही इतिहास संशोधकांमध्ये वेगवेगळे प्रवाद असल्याचे दिसून आले.

परशुरामाने बाण मारून समुद्र आटवून गोव्याची रचना केली असे जरी मानले जात असले तरी ती एक दंतकथाच असण्याची शक्यता इतिहासाच्या एका अध्यापकाने व्यक्त केली. ते म्हणाले, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या समुद्र तटाजवळ असलेल्या प्रदेशाची रचना जवळपास एकसारखी असून गोव्याच्या रचनेसंदर्भात जी व्याख्या तयार झाली आहे, तिला समानार्थी अशा व्याख्या इतर राज्यातही प्रचलित आहेत, पण त्यांचे संदर्भ वेगळे आहेत

Goa
गोव्यातील आंबा शौकिनांसाठी 'पर्वणी'

ते म्हणाले, गोव्याची रचना परशुरामाने केली हे मिथक सह्याद्री खंडातून पुढे आले. 1847 साली जेर्हार्ल्ड डिकुन्हा यांनी ही माहिती लिखित रुपात आणली त्यावेळी ती पुढे आली. तोपर्यंत सह्याद्री खंड हा 14 वेगवेगळ्या हस्तलिखित स्वरूपात होता. डिकुन्हा यांनी त्यांचे एकत्रित संकलन केले. मात्र, गजाननशास्त्री गायतोंडे यांनी त्याचे पुनर्लेखन केले ते वेगळ्या स्वरूपात होते. याचाच अर्थ वेगवेगळ्या इतिहासकारांनी तो वेगवेगळ्या स्वरूपात लिहिला आहे. त्यामुळे या मिथकाचा अर्थही बदलला आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

प्रजल साखरदांडे म्हणाले, गोव्याची रचना परशुरामाने बाण मारून केली की नाही हे जरी मिथक असले तरी भूशास्त्रीय अभ्यासाप्रमाणे गोव्याची भूमी समुद्रातून तयार झाली आहे हे स्पष्ट होत असून सारस्वतांची 96 कुळे गोव्यात स्थाईक झाली होती हे सत्य नाकारता येणार नाही. इतिहास अभ्यासक योगेश नागवेकर यांच्या मते काणकोण येथील डोंगराळ भागात शिंपल्याचे थर आढळून येतात. त्यांतून गोवा समुद्रातून तयार झाला आहे हे सिद्ध होते. त्यामुळे परशुरामाने गोवा तयार केला ही गोष्ट कदाचित खरीही असू शकेल, असे मत व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com