सासष्टी
किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतीसाठी घेतलेले कर्ज वेळेवर फेडल्यास शेतकऱ्यांना पूर्ण व्याज माफीचा लाभ मिळणार आहे. या योजनेखाली शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे सहजरीत्या पीक कर्ज मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनेचा लाभ घेण्यास अनेक शेतकरी पुढे आले असून शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्क्यांच्या व्याजदरात पुरविण्यात येणार आहे. किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा लाभ किसान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतल्या शेतकऱ्यांना घेण्यास मिळावा, यासाठी तरदूत करण्यात आली असून गोव्यातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी कृषी विभागाद्वारे जागृती करण्यात येत आहे, अशी माहिती कृषी खात्याचे संचालक नेवील आफोन्सो यांनी दिली.
या योजनेखाली शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार असून शेतकऱ्यांना अगोदर कर्ज घेतल्यास हमी द्यावी लागत होती. मात्र, आता १.६० लाखपर्यंत कर्ज घेतल्यास कोणतीही हमी द्यावी लागणार नसून शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्ज घेतल्यास हमी द्यावी लागणार आहे. शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज ७ टक्के व्याजदारात पुरविण्यात येणार असून वेळेवर कर्ज भरल्यास नाबार्ड आणि भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून शेतकऱ्यांना ३ टक्के व्याजमाफी व गोवा सरकारकडून ४ टक्के व्याजमाफी देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना या कर्जाच्या अखेरीस फक्त शून्य टक्के व्याजदर बॅंकला भरावे लागणार आहे, असे आफोन्सो यांनी सांगितले.
|