पणजी : गोव्यात द्वैभाषिक लिहिणारे फार कमी लेखक झालेले दिसतात. अलीकडे अनैसर्गिक भाषावाद उकरून काढला जातो, ही दुर्दैवाची बाब आहे. शंकर रामाणी यांनी दुसऱ्या राज्यात जाऊन कोकणी-मराठी साहित्य निर्माण केले. त्यांनी दोन्ही भाषांवर प्रेम केले. मात्र, हा कवी एवढ्या लांब का राहिला, हा प्रश्न मला पडतो, अशी खंत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर मावजो यांनी व्यक्त केली.
साहित्य अकादमी, कला व संस्कृती संचालनालय आणि कवी शंकर रामाणी जन्मशताब्दी समारंभ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कविवर्य शंकर रामाणी जन्मशताब्दी समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. रामाणी यांच्या कवितांच्या समग्र अशा कोकणी पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी सायंकाळी कला व संस्कृती खात्याच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर मावजो, ज्येष्ठ साहित्यिक ॲड. उदय भेंब्रे, कवी परेश कामत आणि माधव बोरकर उपस्थित होते.
कवी शंकर रामाणी यांनी दिलेले अभिप्राय हा पत्रव्यवहारातून व्यक्त केला होता. ते पत्रातून संवाद साधायचे, आजही त्यांनी पाठविलेली पत्रे आपल्याकडे आहेत, अशा आठवणींना उजाळा देत मावजो म्हणाले की, रामाणी हे कधीही स्वतःच्या कवितांविषयी समाधानी नसत, ते सतत अस्वस्थ वाटायचे. अस्वस्थता हा लेखकाचा चांगला गुण असतो. तरच त्याला चांगले साहित्य लिहिण्याची उमेद निर्माण होते.
यावेळी उदय भेंब्रे म्हणाले, लेखकांनी काय लिहावे आणि काय नको हे त्याने ठरविले पाहिजे. अलीकडे लेखकांना हेच लिहा, असे सांगण्याची पद्धत आली आहे. ही पद्धत दर्जेदार साहित्य निर्मितीला खोडा घालणारी आहे. लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आळा घालणाऱ्यांना अधिकार कोणी दिला, ते स्वातंत्र्य केवळ भाषणापुरते राहिले आहे का, असा सवाल भेंब्रे यांनी उपस्थित केला.
गोव्यातील रामचंद्र नाईक, लक्ष्मणराव देसाई, पांडुरंग भांगी, शंकर रामाणी आणि बा. भ. बोरकर हे साहित्यिक म्हणून पुढे येण्यामागे पोर्तुगीज काळात असलेल्या ‘लिसिवार’ या शैक्षणिक संस्थेचा वाटा कसा होता, यावर उदय भेंब्रे यांंनी यावेळी प्रकाश टाकला.
पत्रव्यवहारातून मैत्री
कवी परेश कामत म्हणाले की, रामाणी यांचा मला दहा ते बारा वर्षांचा सहवास लाभला. 20 व्या वर्षी मी काव्य लिहिले, तेव्हा रामाणी यांचे वय 60 वर्षे होते. 40 वर्षांचा दोघांमध्ये फरक असतानाही ते पत्रव्यवहारातून संपर्क साधत. रामाणी हे सामान्य कवी राहिले. त्यांच्या काव्यातून एक प्रकारची साधना दिसून येते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.