Mahadayi Water Dispute: गोव्यातील नेत्यांसाठी दिल्लीतील 'गारवा' जरा त्रासदायक

गोव्याचे शिष्टमंडळ अमित शहांच्या दरबारी पोहोचले मात्र त्यांना तिथे थंड प्रतिसाद मिळाल्याचे बोलले जात आहे.
Goa ministers| Mahadayi Water Dispute
Goa ministers| Mahadayi Water Dispute

Mahadayi Water Dispute: म्हादई प्रश्नावरून राज्यातील वातावरण आता तापू लागले आहे. विरोधी पक्ष आणि जनआंदोलनही आक्रमक होत असल्याने मुख्यमंत्री आणि त्‍यांच्‍या शिष्टमंडळाने बुधवारी दिल्ली गाठली. ठरल्यानुसार हे शिष्टमंडळ अमित शहांच्या दरबारी पोहोचले.

जवळपास दहा जणांच्या या शिष्टमंडळात असलेल्या सर्व सदस्यांना दिल्लीतील ‘थंड’ वातावरणाचा अनुभव आला. सध्या दिल्लीतही कडक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे गोव्यातील नेत्यांसाठी दिल्लीतील गारवा जरा त्रासदायक ठरला असावा.

त्यामुळेच कुणी जॅकेट तर कुणी कोट घालून होते. अमित शहांसोबत काढलेल्या छायाचित्रातही सर्व जण उबदार कपड्यांमध्येच दिसताहेत. दिल्लीतील वातावरण थंड जरी असले तरी शिष्‍टमंडळ गोव्यात पोहोचताच ‘गरमी’ सहन करावीच लागणार आहे. कारण हाती काहीच लागलेले नाही.

Goa ministers| Mahadayi Water Dispute
Manohar International Airport: 'टॅक्सी बॅच रद्द करण्याचे षडयंत्र सरकारचेच'

फोंड्यात उमेदवारांची घालमेल!

फोंडा नगरपालिकेची निवडणूक येत्या एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. आता फक्त अडीच महिनेच शिल्लक राहिल्याने सध्या इच्छुक उमेदवारांनी आपापल्या संभाव्य प्रभागांची चाचपणी सुरू केली आहे.

यावेळी भाजप फोंडा पालिका ताब्यात घेण्यासाठी मोठे प्रयत्न करणार आहेत, हे निश्‍चित असले तरी विरोधातील मगो आणि काँग्रेसकडूनही आपापल्या परीने प्रयत्न होतील, हेही ठरले आहे. हे सगळे ठरले तरी अजून उमेदवार निश्‍चिती झालेली नाही.

कुठला प्रभाग राखीव राहील, कुठला महिलांसाठी ठेवण्यात येईल, हे नक्की झाले नसल्याने सध्या इच्छुक उमेदवारांच्या जीवाची घालमेल सुरू आहे. आता एवढे निश्‍चित आहे, विद्यमान पंधरांपैकी आठ ते नऊच उमेदवार यावेळी रिंगणात उतरतील, हे मात्र नक्की

बाणावलीचे व्‍हेंझी मुख्यमंत्र्यांवर नाराज?

काही महिन्यांपूर्वी विरोधी गटात असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे गोडवे गाणारे बाणावलीचे आमदार व्‍हेंझी व्‍हिएगस हल्ली मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करू लागले आहेत. साळ नदीचे प्रदूषण तक्रार करूनही बंद झालेले नाही व त्यासाठी मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत असे म्हणण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.

काल-परवापर्यंत मुख्यमंत्री सावंत यांच्या प्रेमात पडलेले व्‍हेंझी अकस्मात बदलले कसे? कित्येकांना हा प्रश्न पडला आहे. मुख्यमंत्री त्‍यांना जवळ करत नाहीत की दिल्लीतून केजरीवालांच्‍या कार्यालयातून त्यांना कानपिचक्या मिळाल्या आहेत? कारण अजून अस्पष्टच आहे.

Goa ministers| Mahadayi Water Dispute
Manohar International Airport: टॅक्‍सीचालकांकडून अर्जांची होळी

सुधीरभाईचे संघप्रेम

म्हापसा पालिकेचे नगरसेवक सुधीर कांदोळकर यांनी भाजपशी फारकत घेतली असली तरी त्यांचे पक्षावरील तसेच संघावरील प्रेम काही कमी झालेले दिसत नाही. आजही त्यांच्या मनात पक्ष व संघाविषयी तिच आस्था असल्याचे दिसून येते.

मध्यंतरी पणजीत आरएसएसची मोठी सभा झाली. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत आले होते. या सभेला कांदोळकरांनी उपस्थिती लावली. त्यामुळे अनेक तर्कविर्तक काढले जाताहेत. राजकारणात कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्या मर्जीतील तसेच त्‍यांच्‍याजवळील व्यक्ती अशी कांदोळकरांची ओळख!

विशेष म्हणजे लोबो साहेब पुन्हा भाजपवासी झाले. त्यामुळे सुधीर भाई हे कधी औपचारिक घरवापसी करतात आणि संघाची टोपी घालतात हे पाहुया!

रेजिनाल्ड, सिक्वेरांची भूमिका काय?

म्हादई वाचविण्यासाठी जी ‘चलो साखळी’ची हाक दिली आहे, तिला सर्वांत जास्त प्रतिसाद जर कुठून मिळत असेल तर तो सासष्टीतून. खलाशी, रेंदेर, मच्छीमार आदी गटाकडून या हाकेला उदंड प्रतिसाद मिळत असून दुसऱ्या बाजूने कलाकारही म्हादईसाठी धावून येण्याच्या तयारीत आहेत.

या सर्वांत गोची कुणाची झालेली असेल तर भाजपमध्‍ये सामील झालेले नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा आणि सरकारला पाठिंबा दिलेले कुडतरीचे आमदार आलेक्‍स रेजिनाल्ड लॉरेन्‍स यांची. रेजिनाल्ड यांनी कर्नाटक सरकारला मिळालेला डीपीआर मागे घ्यावा अशी मागणी करणारे पत्रक जारी करून याबाबत तोंडदेखला विरोध व्यक्त केला आहे.

पण सिक्वेरा यांनी तिही तसदी घेतलेली नाही. त्यामुळे सासष्टीतील लोक त्यांना समाजमाध्यमावरून प्रश्र्न करू लागले आहेत, म्हादईबाबतची तुमची भूमिका काय? तिथे बाणावलीचे चर्चिल इर्मावही याबाबतीत मूग गिळून गप्पच बसले आहेत बरं का! यापूर्वी तेही ‘म्हादय माय आमका जाय’ असे म्हणायचे बुवा!

Goa ministers| Mahadayi Water Dispute
Pilerne Fire: ‘बर्जर बेकर’ कंपनीवर गुन्हा नोंदवून 100 कोटी वसूल करा'

‘जय दामोदर’ही आक्रमक

म्हादई प्रश्नामुळे एक जमेची बाजू म्हणजे या लढ्याला काही प्रमाणात जनमत कौलावेळची झाक येताना दिसत आहे. त्यावेळी गोव्याचे वेगळे अस्‍तित्व कायम ठेवण्यासाठी अनेक व्यक्ती व छोट्या-मोठ्या संस्था-संघटना मैदानात उतरल्या होत्या, तशा आताही संघर्षासाठी सज्ज होताना दिसत आहे.

आमचे ‘जय दामोदरवाले’ महेशरावही त्यातीलच एक. सामाजिक समस्यांबाबत आवाज उठविण्यासाठी ते पदरमोड करून तेथे धाव घेत असतात. म्हादईप्रश्‍‍नीही ते पेटून उठले आहेत. त्यासाठी ते येत्या 16 रोजी प्रथम आझाद मैदानावर व नंतर साखळी मेळाव्याच्या वेळी तेथे उपोषणाला बसणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com