डिचोली
तोपर्यंत ट्रकांची रांग लागली होती. डिचोली-साखळीमार्गे गेल्या अनेक दिवसांपासून खनिज वाहतूक सुरू आहे. आजही (शुक्रवारी) डिचोली-साखळीमार्गे आमोणेपर्यंत खनिज वाहतूक सुरू होती. मात्र, पावसामुळे ट्रकांमधील पाणीमिश्रीत खनिज सर्वत्र रस्त्यावर सांडत होते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ता लाल होवून रस्ता चिखलमय बनला होता. त्यातच सकाळी पडलेल्या बारीक पावसावेळी साखळीत या रस्त्यावरील खनिजाच्या चिखलावर घसरुन दोन दुचाकीही घसरुन पडण्याच्या घटना घडल्या. या प्रकारामुळे संतप्त बनलेल्या साखळीचे माजी सरपंच प्रवीण ब्लेगन यांनी अन्य नागरिकांच्या मदतीने गोकुळवाडी येथे खनिजवाहू ट्रक अडवले. यावेळी नगरसेवक राया पार्सेकर, माजी नगरसेवक रियाज खान, आनंद वेरेकर आदी जागृत नागरिक उपस्थित होते. ट्रक अडविल्यानंतर साखळी पोलिस चौकीचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देताच, डिचोलीचे पोलिस निरीक्षक संजय दळवी घटनास्थळी हजर झाले. त्यांनी ट्रक अडवलेल्या नागरिकांशी चर्चा केल्यानंतर पावसात खनिज वाहतूक बंद ठेवण्याची सुचना संबंधित कंत्राटदाराला केली.
गेल्या अनेक दिवसांपासून साखळी भागातून बेदरकारपणे खनिज वाहतूक सुरू आहे. मात्र, आर्थिक अडचणीत असलेल्या ट्रकवाल्यांचा विचार करुन आम्ही ट्रक अडवण्याचा विचार केला नाही. मात्र, पावसात होणाऱ्या खनिज वाहतुकीमुळे रस्ता चिखलमय बनून त्याचा मनस्ताप अन्य वाहनचालकांना विशेष करुन दुचाकीस्वारांना तसेच पादचाऱ्यांना होत होता.ट्रकमधून पाणीमिश्रीत चिखलमय खनिज दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांच्या अंगावर सांडत होते. या चिखलामुळे दुचाकीस्वारही घसरुन पडले. या साऱ्या प्रकारामुळे अखेर खनिज वाहतूक रोखण्याशिवाय पर्याय नव्हता. असे मत प्रवीण ब्लेगन यांनी व्यक्त केले. आमचा रोष ट्रकवाल्यांवर नाही. तर भर पावसातही मुख्य रस्त्यावरुन खनिज वाहतूक सुरू ठेवणे, हा सरकारचा निष्काळजीपणा आहे. अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
संपादन - यशवंत पाटील
|