Revolutionary Goans: रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) तसेच निवडणुकीच्या तीन महिन्यांपूर्वी येणाऱ्या काही तथाकथित राजकीय पक्षामुळे काँग्रेस पक्षाला यावेळी स्पष्ट बहुमत मिळाले नाही, असा आरोप करीत काँग्रेसचे उत्तर गोवा माजी जिल्हाध्यक्ष तसेच नेते विजय भिके यांनी ‘आरजी’ पक्षावर सडकून टीका केली. मंगळवारी म्हापशात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, प्रणव परब, आसिफ हे हजर होते.
विजय भिके म्हणाले, ‘आरजी’ पक्ष हा केवळ तोंडाच्या बाता मारतो, प्रत्यक्ष काम करीत नाही. त्याउलट काँग्रेस पक्षाने नेहमीच लोकांच्या प्रश्नासाठी लढा दिला. तसेच मुद्दे घेऊन काँग्रेस स्त्यावर उतरला आहे. मध्यंतरी कोविडच्या काळात असो किंवा महागाईबाबत काँग्रेसने नेहमीच सरकारला धारेवर धरले. तेव्हा ‘आरजी’ कुठे होता? मुळात आरजी ही भाजपाची ‘बी टीम’ आहे. भाजपाकडून निधी घेऊन ते स्वतःची राजकीय पोळी भाजतात.
म्हादई नदीचा विषय, बेरोजगारीचा मुद्दा यासारखे गोव्याच्या नानाविध प्रश्नांवर ‘आरजी’ने कधीच समोर येऊन सरकारला घेरले नाही. फक्त काँग्रेस पक्षानेच हे मुद्दे उचलून धरले व भाजपा सरकारवर टीका केली, असा दावा करीत भिकेंनी ‘आरजी’वर निशाणा साधला.
कायद्यात त्रुटी: काँग्रेसच्या आठ आमदांराबाबत प्रश्न विचारला असता भिके म्हणाले, मुळात पक्षांतर विरोधी कायदा हा गोव्यामुळे अस्तित्वात आला आहे. या कायद्यात काही त्रुटी असल्याने सध्या भाजपावाल्यांचे फावत असल्याचे भिके म्हणाले.
निवडणुकीची संधी: ‘आरजी’ सारखे पक्ष धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करतात. अशावेळी फक्त भाजपा व काँग्रेस या दोन्हीच पक्षानी निवडणूक लढायची का? असे विचारले असता भिके म्हणाले, संविधानाने प्रत्येकास निवडणूक लढविण्याची संधी दिली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.