धारबांदोडा : गोव्यातील धारबांदोडा तालुका हा कृषिप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात भातशेती, भाजीपाला शेती, कुळागरे ऊस अशी अनेक प्रकारची पिके घेतली जात आहेत. काही काळ येथील शेतकऱ्यांनी कृषिक्षेत्राकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, यंदा कोरोना संसर्गाचा प्रसार असला तरी बहुतेक शेतकरी पावसाळी शेतीकडे वळल्याचे चित्र आहे. तालुक्यातील सुमारे ३०० हेक्टर जमीन भातशेती लागवडीखाली येत असून यंदा सुमारे १७० हेक्टर जमीन भातशेती लागवडीखाली येण्याची शक्यता धारबांदोडा कृषी अधिकारी नागेश कोमरपंत यांनी व्यक्त केली आहे.
भाजी पाल्यासाठी सुमारे ५७ हेक्टर जमीन आहे. मात्र, ती यंदा वाढण्याची शक्यता असून साठ ते सत्तर हेक्टर जमीन भाजीपाला लागवडीखाली येऊ शकते असेही ते म्हणाले. यंदा कुळे शिगाव पंचायत क्षेत्रातील बाळीकुळण येथील सुमारे २८ हेक्टर दाभाळ-किर्लपाल पंचायत क्षेत्रातील दावकोण येथील ३० हेक्टर व दाभाळ येथील सुमारे १० हेक्टर जमीन भातशेती लागवडीखाली येणार आहे. शिवाय मोले, साकोर्डा भागातील शेतकरी शेतीकडे वळणार आहेत.
कुळे शिगाव पंचायत क्षेत्रातील वाकीकुळण येथे मोठी शेती जमीन आहे. येथे पारंपरिक पद्धतीने शेतीची लागवड केली जात होती. मात्र, रानटी जनावरांच्या उपद्रवाला कंटाळून गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी शेती सोडून दिली होती. यंदा या संपूर्ण शेतीला पावर (विद्युत) कुंपण बसविण्यात आले असून बहुतेक शेतकरी यंदा शेतीकडे वळले आहेत.
लॉकडाऊन असो किंवा इतर कारणामुळे यंदा शेतकऱ्यांचा शेती व्यवसायाकडे वळण्याचा कल असून यंदा धारबांदोडा तालुक्यात शेती व भाजीपाला लागवडीने खुलून येणार असल्याचे चित्र आहे. खाण व्यवसायामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर बरेच शेतकरी शेतीकडे वळत आहेत. तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांच्या पारंपरिक शेती लागवडीकडे कल होता. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात शेतीवर खर्च होत होता. यंदा शेतीचा लागवड यंत्राद्वारे व्हावी, यासाठी कृषी अधिकारी नागेश कोमरपंत यांनी प्रयत्न केले होते. यंत्राद्वारे लागवड केल्यास होणारा खर्च कमी प्रमाणात कसा होत आहे. याची माहिती त्यांनी शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन केले.
या त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून १७० हेक्टर पैकी २५ हेक्टर शेती ही यंदा यंत्राद्वारे लागवडीखाली येणार असल्याचे ते म्हणाले.
पुढे माहिती देताना कोमरपंत म्हणाले, दरवर्षी भाजीपाला लागवडीसाठी कृषी विभागाकडून सुमारे पंधरा किलो बियाणे वितरित करण्यात येत होते. मात्र यंदा ५५ किलो बियाणे वितरित करण्यात आले आहे. यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड होणार आहे. |
|