Panjim: राजधानीला लागलाय ‘ब्रेक’; वाहतूक कोंडीचा प्रश्‍न नेमका सुटणार कधी?

वाहतुकीचा खोळंबा: जागोजागी खोदकाम; बेशिस्त पार्किंग; नियोजनाचा अभाव
Traffic jam Panjim
Traffic jam PanjimDainik Gomantak

Panjim: राजधानी पणजीत राज्यातील सर्व खात्यांची मुख्यालये, विविध संस्था आदी असल्याने सतत नागरिकांची वर्दळ असते. यामुळे दररोज हजारो वाहने शहरात फिरत असतात. त्यातून होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या झाली असून संबंधित यंत्रणादेखील त्याकडे डोळझाक करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे राजधानीची गती मंदावली आहे.

तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो असाच प्रकार सध्या सरकारी यंत्रणांचा सुरू असल्याने पणजीतील नागरिक या समस्येने त्रस्त आहेत. हा वाहतूक कोंडीचा प्रश्‍न नेमका सुटणार कधी? आणि सोडवणार कोण? असे प्रश्‍न सर्वसामान्यांना सतावत आहेत.

जर पणजी महानगरपालिका हा प्रश्‍न सोडविण्याचा गांभीर्याने विचार करत असेल तर त्यासाठी शहरातील अंतर्गत वाहतूक सेवा सुधारण्यासाठी पावले उचलणे नितांत गरजेचे आहे.

शहरात दुपारी शाळा सुटल्यावर व विविध सरकारी खात्यांचे कर्मचारी व खासगी कर्मचारी कामवरून सुटल्यावर सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

राजधानीत सुरू असलेल्या खोदकामांमुळेदेखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला समोरे जावे लागत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांचे योग्य नियोजन न केल्याने नाहक त्रास होत आहे. पणजीच्या मध्यवर्ती भागातच रस्ता खोदल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

जेथे पाहावे तेथे खोदकाम, बांधकाम सुरू असल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले असून वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना याचा अधिक त्रास जाणवत आहे.

पणजीकरांना खोदकामांमुळे पाच मिनिटांच्या अंतरासाठी पंधरा ते वीस मिनिटांचे अंतर कापावे लागत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेले काम अतिशय धीम्यागतीने सुरू आहे.

Traffic jam Panjim
Mahadayi Water: म्हादई प्रश्नावर तृणमूल काँग्रेस आक्रमक; आझाद मैदानावर निषेध मोर्चा

शहरातील इतर मार्गांवरही अशीच परिस्‍थिती दिसून येते. या ठिकाणी वाहतूक पोलिस असतील तर शक्‍यतो वाहतूक कोंडी होत नाही. मात्र, पोलिस नसतील तर बेशिस्‍तपणे पार्किंग केले जाते. याचा त्रास मग इतर वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही होतो. वाहतूक कोंडीच्या ठिकाणी नियमितपणे पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

पणजीत होणाऱ्या विकासाचे स्वागत आहे. मात्र, नियोजन योग्य पद्धतीने व्हावे. मार्चपूर्वी स्मार्ट सिटीअंतर्गत येणारी कामे पूर्ण करण्यासाठी अनागोंदी सुरू आहे.

आपण महापौर असताना पणजी शहर, तसेच जुने गोवे ते बांबोळी या भागात सीएमपीअंतर्गत गाड्या आणण्याचा विचार होता; परंतु नंतर तो बारगळला. त्यामुळे आता भविष्यात असा विचार होईल, असे मला वाटत नाही. - सुरेंद्र फुर्तादो, माजी महापौर

पणजी शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, त्यासाठी शहरात जी कामे सुरू आहेत. ती पूर्ण होणे गरजेचे असून त्यानंतरच याचा विचार करता येईल. त्यामुळे ही कामे लवकर पूर्ण व्हावीत, ही अपेक्षा आहे. - उदय मडकईकर, माजी महापौर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com