फोंडा
सध्याच्या काळात राजकारण, शिक्षणक्षेत्र, प्रसारमाध्यमे तसेच कलेसह इतर सर्वच क्षेत्रात देशभक्त आणि धर्मप्रेमींविरोधात देशद्रोही आणि धर्मविरोधी अशी आवई उठवली जात आहे. अशाप्रकारच्या वैचारिक ध्रुवीकरणाच्या काळात धर्माची बाजू घेत हिंदू राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करणे हे महत्त्वाचे असून लक्ष्य फार दूर नाही, संघटीत प्रयत्नातून हिंदू राष्ट्र निर्मितीचे ध्येय गाठूया, एकसंध होऊया असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.
यंदाचे नववे हिंदू अधिवेशन ऑनलाईन पद्धतीने कालपासून सुरू झाले असून या अधिवेशनात देश विदेशातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ते, विचारवंत व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थिती लावत आहेत. समितीच्या यू ट्यूब चॅनल आणि फेसबूूकद्वारे हे अधिवेशन लोकांपर्यंत पोचवले जात आहे.
डॉ. चारुदत्त पिंगळे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, कोरोना महामारी असो अथवा भविष्यात ठाकलेले तिसरे महायुद्ध असो, येणारा काळ हा हिंदुत्वनिष्ठांसाठी अनुकूल राहणार असून हिंदू राष्ट्राची मागणी सातत्याने करीत रहायला हवे. सर्वांच्या संघटीत प्रयत्नांमुळे हिंदू राष्ट्राची मागणी पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अधिवेशनाचा प्रारंभ हा शंखनाद, वेदमंत्रांचे पठण व डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाला. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे प्रेरणास्थान व गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या आशीर्वादरुपी संदेशाचे वाचन धर्मप्रचारक सत्यवान कदम यांनी केले. अधिवेशनाचा उद्देश सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी स्पष्ट केला तर सुमीत सागवेकर यांनी सूत्रसंचालन केले.
या अधिवेशनात नेपाळचे समितीचे अध्यक्ष डॉ. माधव भट्टराई यांनी निधर्मी आणि विदेशी लोकांच्या काळ्या कृत्यांमुळे नेपाळला हिंदू राष्ट्र घोषित करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. नेपाळ आणि भारत ही दोन्ही राष्ट्रे हिंदू राष्ट्र होण्यासाठी जगातील हिंदुंनी सांप्रदायिक स्वार्थ त्यागून संघटीत होऊन आपले योगदान द्यावे असे आवाहन केले.
इंडोनेशिया बाली येथील इंटरनॅशनल डिव्हाईन लव्ह सोसायटीचे अध्यक्ष तसेच वर्ल्ड हिंदू फेडरेशनचे उपाध्यक्ष धर्मयेशाजी यांनीही आपले विचार व्यक्त केले. कर्नाटकातील श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी हिंदूद्रोही व हिंदुविरोधी राष्ट्रविघातक शक्तींना प्रखर उत्तर म्हणजेच हिंदू राष्ट्राची निर्मिती असल्याचे स्पष्ट केले.
संपादन ः संजय घुग्रेटकर
|