नीलेश काब्राल हतबल; मॉन्सूनपूर्वी राज्यातील रस्ते दुरुस्त होणे अशक्य

खड्ड्यांचे संकट कोण सोडवणार?
Nilesh Cabral
Nilesh CabralDanik Gomantak

पणजी : राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे जनता हैराण आहे. अनेक ठिकाणचे खड्डे मृत्यूचा सापळा बनले आहेत. यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा न्यायालयाने 15 मे पर्यंत सर्व खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले असतानाही खुद्द सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी 15 मे पर्यंतच नव्हे तर मॉन्सून सुरू होईपर्यंतही सरकार गोव्याला खड्डे मुक्त करू शकत नाही, असे व्यक्तव्य केले आहे. खुद्द सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनीच खड्डे बुजवण्याबाबत हात टेकले असताना आता जनतेसमोर असलेले खड्ड्यांचे संकट सोडवणार तरी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Public Works Minister Nilesh Cabral said it was impossible to repair roads in the state before the monsoon)

राज्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाबरोबरच प्रमुख शहरांना जोडणाऱ्या राज्य महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. अशातच अनेक ठिकाणचे रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत. पावसाळा तोंडावर ठेपल्याने हे खड्डे वेळेत बुजविणे गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्ग 66 च्या बगल रस्त्यांचे काम आणि जोडरस्त्यांचे काम अद्यापही रखडलेले आहेत.

पणजी-मडगाव, मडगाव-काणकोण या रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने या विरोधात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात आंदोलन केले होते. यावर सरकारने तातडीचे उपाय करणे गरजेचे होते. याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा न्यायालयाने 15 मेपर्यंत खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्यातील रस्त्यांची डागडुजी सुरू झाली. पण मॉन्सूनपर्यंत म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व रस्ते चकाचक करणे शक्य नाही, अशी हतबलता खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात पुन्हा खड्ड्यांना सामोरे जावे लागणार आहे.

Nilesh Cabral
'मोपा पिडीत शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी'

स्वेच्छा जनहित याचिका

2019 मध्ये उच्च न्यायालयाने स्वेच्छा जनहित याचिका करून घेतली होती. त्यानंतर सरकारला राज्यातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून खडसावले होते. याच याचिकेवरील निकाल 28 एप्रिल 2022 रोजी दिला होता. या दरम्यानच्या काळात दस्तरखूद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील रस्ते पूर्णतः खड्डे मुक्त करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांनी दिलेल्या तारखा अनेकवेळा पुढे गेल्या. या निकालातही 15 मे पूर्वी राज्यातील खड्डे पूर्णपणे बुजवा असे निर्देश देण्यात आले होते. सरकारने यासाठी आपण काम करू, असेही सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात पावसाळा तोंडावर येऊनही अमलबजावनी न झाल्याने लोकांना खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे, हे निश्चित.

राज्यातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. मात्र, अनेक ठिकाणचे रस्ते मोठ्या प्रमाणात उखडल्याने हे सर्व काम जूनच्या आठवड्यापर्यंत होणे अशक्य आहे. मात्र, यावर सरकार निश्चित उपाय काढणार असल्याने जनतेने काळजी करण्याची गरज नाही, अस नीलेश काब्राल म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com