केळावडे सत्तरीत युवकांचे पावसाळी 'जलसंवर्धन' अभियान

 Rainwater stored around a paddy borewell.

Rainwater stored around a paddy borewell.

वाळपई: दिवसेंदिवस पाणी टंचाई ही उन्हाळ्यात जाणवणारी मोठी समस्या बनणार आहे. त्यासाठी आता माणसांनीच काहीतरी उपाययोजना हाती घेतल्या पाहिजेत. महाराष्ट्रात ग्रामीण भागातील लोक स्वत: परिश्रम करून श्रमदानातून डोंगराच्या उतारावर चर मारून पाणी साठविण्याची किमया करीत आहेत. तशीच गोव्यातही राबविण्याची फार आवश्यकता आहे. काही वर्षापूर्वी सरकारने नदीच्या पात्रात बंधारे बांधण्याचे काम केले. आज त्याचा फायदा हिवाळी, उन्हाळी हंगामात शेतकरी वर्गाला सिंचनासाठी होताना दिसत आहे. त्या पलीकडे जाऊन लोकांचेही काही पाणी साठविण्याचे दायित्व स्वीकारून व त्याच मार्गाचा अवलंब करीत सत्तरी तालुक्यात केरी पंचायत क्षेत्रातील केळावडे गावात गोव्यातील विविध भागातील तरुणांनी पावसाळी पाण्याची साठवणूक करणारी ‘जलसंवर्धन’ संकल्पना यंदा राबविली आहे.

पावसाचे वाहून जाणारे पाणी कसे साठविता येईल, तसे नियोजन करून काम केले आहे. त्यासाठी केळावडे गावचे युवा शिक्षक

विनय गावस, संतोष गाड (केरी), कौशल पार्सेकर (म्हापसा), नेहाल शिरगावकर (म्हापसा), विक्रमादित्य पणशीकर (पेडणे), राहुल नागवेकर (आर्किटेक, पर्वरी) आदींनी मिळून हा प्रथमच सत्तरीत प्रयोग केला आहे. यात विक्रमादित्य पणशीकर व संतोष गाड हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम करीत आहेत.

विनय गावस यांनी सांगितले की, केरी येथे १९८४ साली अंजुणे धरणाची निर्मिती झाली होती. त्यावेळी तेथील लोकांना केळावडे गावात जागा देण्यात आली होती. केळावडे गावात श्री सातेरी केळबाय मंदिराच्या मागील जागेत पाणीपुरवठा विभागाची इमारत आहे. तिथे बोरवेल आहे. तिचे पाणी त्यावेळी सुमारे चौदा वर्षे लोकांना पुरविण्यात आले होते. कालांतराने ही बोरवेल बंद होऊन इमारत पडिक अवस्थेत होती. या जागेत पाणी साठविण्यासाठी उपाय योजना करू शकतो, असा विचार आमच्या तरणाई टीमच्या मनात आला. गतवर्षी संतोष गाड यांनी केरी पंचायतीत दुसऱ्या एका जलशक्ती अभियानाची माहिती सांगितली होती.

आम्ही यावर्षी मे महिन्यात केरी पंचायतीत पत्रव्यवहार करून सार्वजनिक बांधकाम खात्याची पडिक जागा वापरण्यास परवानगी द्यावी, असे निवेदन दिले होते. पंचायतीने आम्हाला या जलसंवर्धन कामासाठी मंजुरी दिली व आम्ही कामाला लागलो. या ठिकाणी पावसाचे वाहून जाणारे पाणी व छतावरुन वाहणारे पाणी अशा प्रकारे जमिनीत साठविण्याची प्रक्रिया केली आहे. छतावरील पाण्यासाठी प्लास्टिक पाईप बसवून पावसाचे पाणी पडिक बोरवेलमध्ये सोडण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या प्रकारात पावसाचे वाहते पाणी जमिनीत मीटरभर खोलीचे अनेक चर तयार करून साठविले आहे. या प्रयोगातून जमीनीत लाखों लीटर पावसाचे पाणी साठविले जाणार आहे. त्याचा फायदा पाण्याची पातळी वाढून जवळील असलेले जलस्त्रोतातील पाणी वाढण्यास मदत होणार आहे असे गावस म्हणाले.

केळावडे गावातील उपक्रम कौतुकास्पद

जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकवेळी सरकारवर अवलंबून न राहता लोकांनी स्वत: काम केले पाहिजे. आम्ही अशा उपक्रमांसाठी इच्छुक गावातील लोकांना मार्गदर्शन करण्यास तयार आहे. त्यासाठी इच्छुकांनी ९६३७९५०२३१ या क्रमांकाशी संपर्क करावा, असे विनय गावस यांनी सांगितले आहे. पावसाचे नैसर्गिक पाणी साठविल्यास ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना लाभदायी ठरणारी आहे. केळावडे गावात केलेला हा सामाजिक उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com