पाळी
कोरोनासारख्या असुराशी लढण्यासाठी आत्मिक बळाची आवश्यकता असते. मन शांत असेल तरच आपल्याला चित्त एकाग्र करता येते. त्यामुळे आत्मिक बळ आणि प्रतिकार शक्ती वाढवताना मनःशांतीसाठी अध्यात्माचा प्रभावी वापर होऊ शकतो, त्यासाठी साईनामाचा जप करणे गरजेचे असल्याचे मत कसई येथील दादा साई मंदिराचे दादा महाराज यांनी आपल्या आशीर्वचनात सांगितले.
कसई येथील दादा साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साध्यारीतीने साजरा करण्यात आला. कोरोनामुळे उत्सवांवर निर्बंध आले असल्याने केवळ पूजाविधी व इतर जुजबी कार्यक्रमांसह हे उत्सव साजरे होत आहे. दरवर्षी कसईच्या दादा साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाला भाविकांची मोठी उपस्थिती लाभते. दिवसभर अनेक कार्यक्रम यावेळी साजरे केले जातात. यंदा मात्र या कार्यक्रमांवर निर्बंध आले आहेत.
गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक विधी झाले. अभिषेक, आरत्या झाल्यानंतर दादा महाराज यांनी आपल्या आशीर्वचनात साईनामजपाचा महामंत्र भवसागरातून तारून नेण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. आपल्या आशीर्वचनात दादा महाराज म्हणाले, साईबाबांनी दुःखितांचे अश्रू पुसले. गरीब गरजू अडलेल्या नडलेल्या आणि पीडित लोकांचे साईबाबा देवदूत ठरले. परमेश्वरी अवतार असल्याचा साक्षात्कार त्यामुळे भाविकांना झाला. आज प्रत्येकजण आपले दुःख, समस्या साईंसमोर ठेवतो. मूळात मानसिक स्वास्थ्यासाठी चित्त स्थिर असायला हवे. मनःशांतीसाठी जर मन स्थिर असेल तर माणूस कुठल्याही संकटातून तारून जाऊ शकतो.
आज केवळ देशावरच नव्हे तर जगावर कोरोनाचे संकट आले आहे. या संकटरुपी कोरोना राक्षसाचा वध होणे आवश्यक आहे. भगवंतांनी प्रत्येकवेळी असुरांचा वध करण्यासाठी विविध रूपे घेतली आहेत. आज परमेश्वराची साधना, आराधना करण्याबरोबरच मनःशांती आणि आत्मबल वाढवण्यासाठी इतर उपायांबरोबरच साई नामसाधनाही महत्त्वाची आहे. प्रत्येक भाविकांनी रोज साईनामाचा जप करून आरोग्य खात्याने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब केल्यास कोरोनाच्या या महासंकटातून आपण सहीसलामत पार होऊ शकतो, असे दादा महाराज म्हणाले. कठीण दिवस दूर सरतील, आणि चांगले दिवस येतील, असा विश्वासही यावेळी दादा महाराज यांनी व्यक्त केला.
|