वाळपई
सत्तरी तालुक्यात विशेष श्रेणीतील मुले-मुली आहेत. त्यांना केवळ घरी थांबून राहावे लागत होते. विशेष मुलांमध्येही कलांचे गुण असतात. केवळ त्यांना साथ देण्याची गरज असते. ती साथ केशव सेवा साधना संस्थेने सत्तरी तालुक्यात दिली आहे.
वाळपई विशेष मुलांची शाळा सुरू करणे, हे आव्हानात्मक होते. ते आव्हान गोव्यातील केशव सेवा साधना संस्थेने स्वीकारले व २०१२ साली वाळपई जवळच असलेल्या कोपार्डे गावात विशेष मुलांची शाळा सुरू केली होती. तिला यंदा आठ वर्षे होत आहेत. सुरुवातीला दहा पंधरा मुले घेऊन सुरू केलेल्या शाळेत आज ६७ विशेष मुले आनंददायी शिक्षण घेत आहेत. वाळपई भागात शाळा सुरू करण्यासाठी अनेकांकडून बरेच कष्ट घेण्यात आले होते.
सत्तरीत प्रत्येक गावात जाऊन सर्वेक्षण करून विशेष मुले पाहाणे. त्यांच्या पालकांची भेट घेऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगण्याचे काम सत्तरीतील अनेक सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या लोकांनी गावोगावात फिरून बरेच दिवस मिळून केले होते. सध्या शाळेच्या प्रमुख शिक्षिका म्हणून सौ. मंजिरी जोग काम करीत आहेत. तसेच अन्य शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग व संस्थेचे व्यवस्थापन मंडळाचे पदाधिकारी विशेष असे योगदान देत आहेत. कोपार्डे येथे काही वर्षे शाळा चालल्यानंतर शाळेचे स्थलांतर वाळपई येथील सरकारी आरोग्य केंद्राच्या जुन्या आस्थापनात करण्यात आले आहे.
सध्या वाळपईत ही शाळा कार्यरत आहे. शाळेत सर्व सण, उत्सव साजरे केले जातात. पालकही शाळेत नेहमीच जोडले जाण्यासाठी पालकांसाठी पाककला, हार करणे इत्यादी स्पर्धा घेतल्या जातात. स्नेहसंमेलन, क्रीडा महोत्सव हे प्रामुख्याने घेतले जातात. क्रीडा विभागात वाळपईच्या मुलांनी स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
सौ. जोग म्हणाल्या, सत्तरी तालुक्यातील गावातील विशेष विविध वर्गातील मुले शाळेत आनंददायी शिक्षण घेत आहेत. सर्व शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग विशेष मुलांच्या विश्वात अगदी रमून जाऊन सामाजिक सेवेचे कर्तव्य बजावीत आहे. व्यवस्थापन मंडळाचेही सहकार्य मिळते. विशेष मुलांना शिकवण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास असावा लागतो, जिद्द असावी लागते. या मुलांशी खूपच संयमाने वागावे लागते. आमची ही निरागस मतिमंद मुले! देखील देवाची फुले आहेत याची जाणीव झाली पाहिजे. मुलांचा बुद्ध्यांक ७०-५० असतो, अशा मुलांना सौम्य मतीमंदत्व असणारी मुले असे मानले जाते, तर ४९-३५ बुद्ध्यांक असणाऱ्या मुलांना मध्यम मतिमंदत्व असणारी मुले असे मानतात. तीव्र मतिमंदत्व म्हणजेच ३४-२० इतकाच बुद्ध्यांक असणारी मुले आणि अती तीव्र मतिमंद असणारी ज्यांचा बुद्ध्यांक २०पेक्षाही खाली आहे, अशी मुलेही आढळतात असे सौ. मंजिरी जोग म्हणाल्या.
GOA GOA
|