Mandrem : मांद्रेत पारंपरिक पायवाटांचा प्रश्न बिकट; आमदारही हतबल

ग्रामपंचायतीत ठराव घेऊनही होत नाही कार्यवाही
Mandrem
Mandrem Dainik Gomantak

मांद्रे मतदारसंघातील गावांमधील पारंपरिक पायवाटांवरून वर्षानुवर्षे तंटे-बखेडे सुरू आहेत. याविषयी ग्रामपंचायतींमध्ये ठराव घेऊनही कार्यवाही होत नसल्याने स्थानिकांसह पर्यटकही प्रशासनाच्या नावाने बोटे मोडत आहेत.

घर, मंदिर किंवा समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी पूर्वीपासून अनेक पायवाटा आहेत. त्या दगड वा तारेची कुंपणे घालून बंद केल्या आहेत. शिवाय ‘प्रायव्हेट प्रॉपर्टीत प्रवेश करण्यास मनाई आहे’, असे फलकही लावले आहेत. त्या मोकळ्या कराव्यात, यासाठी अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांत ग्रामस्थांनी ठराव मांडले. ठराव मंजूर झाले; परंतु त्यांची कार्यवाही होत नाही.

Mandrem
South Goa: दक्षिण गोव्यातील घर, हॉटेल-लॉजिंग, शॅक मालकांनो भाडेकरू ठेवताय? मग लवकर करून घ्या हे काम अन्यथा...

हरमल किनाऱ्यावर कसे जायचे?

या भागात गोकर्णकर यांच्या घरापर्यंत जाण्यासाठीची पायवाट बंद केली आहे. तेथील जमीन इतरांनी विकत घेतली आणि दगडी कुंपण घातले. त्यामुळे गोकर्णकर यांची वाहने त्या कुंपणाच्या आतच अडकून पडली आहेत. याविषयी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. पण त्यांना कोणीही दात देत नाही.

धार्मिक उत्सवांतही अडथळा

याविषयी आमदार जीत आरोलकर यांनी, स्थानिकांना पायवाटा मोकळ्या करण्याचे आवाहन केले होते. अधिकाऱ्यांशी चर्चा करून पायवाटेचा प्रश्न सोडवण्याची सूचना केली होती. येथील देवदेवतांच्या धार्मिक उत्सवानिमित्त किनाऱ्यावर किंवा इतर उत्सवांसाठी देवाच्या पालख्या ज्या ज्या ठिकाणी जातात, त्याही पायवाटा बंद केल्याने समस्या निर्माण झाली आहे.

किनारे प्रायव्हेट झाले का?

गावडेवाडा-मोरजी येथे पूर्वी बऱ्याच पायवाटा होत्या. किनाऱ्यावर जाण्यासाठी रस्ते नव्हते, म्हणून वाळूच्या तेंबावरून पायवाट केली होती. पण जमीनदाराने जमिनी विकल्यानंतर व्यावसायिकांनी कुंपणे घालून पायवाटा बंद केल्या. त्यामुळे पर्यटक येथे येतात त्यावेळी त्यांना प्रश्न पडतो की, ‘हे किनारे प्रायव्हेट झालेत का?’

Mandrem
Panaji Traffic Video: 'अटल सेतू' बंदचा प्रवाशांना फटका, तब्बल चार तास वाहतूक ठप्प

साहित्यिक कुटुंबही उपेक्षित

पार्से श्री भगवती मंदिर परिसरातील साहित्यिक उल्हास आरोलकर हे गेल्या चार वर्षांपासून घरापर्यंत चारचाकी वाहन नेण्यासाठी सोय करा, अशी मागणी करत आहेत. अनेकदा आरोलकर आणि इतर कुटुंबीयांनी पायवाटेची मागणी केली.

पोलिस चौकीही कचाट्यात

हरमल पोलिस चौकीकडे जाण्यासाठी २२ वर्षांपासून पायवाटही नाही. दुचाकी कशी तरी अडगळीतून न्यावी लागते. चारचाकी वाहन या स्टेशनपर्यंत जाऊ शकत नाही. ही पायवाट मोकळी करावी किंवा पोलिस चौकी स्थलांतरित करून लोकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.

डिकुन्हांची कुचंबणा

मोरजी येथील फिलिप डिकुन्हा आणि मांद्रे मधलामाज येथील श्रीमती डिकुन्हा यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी पायवाट नसल्याने त्यांना अनेक अडचणी निर्माण होतात. गेल्या पावसाळ्यात आमदार आरोलकर यांनी अधिकाऱ्यांसोबत या घरांची पाहणी करून त्यांना पर्यायी पायवाट देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांना पायवाट उपलब्ध झालेली नाही

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com