मडगाव : आपल्या रुपेरी वाळूसाठी जगप्रसिद्ध असलेली सासष्टीची बाणावली पासून केळशी पर्यंतची किनारपट्टी तेल तवंग पसरल्याने काळी ठिक्कर पडली आहे. या किनारपट्टीवरून सध्या चालणेही मुश्किल बनले आहे. मागचे तीन दिवस हे काळे तेलाचे गोळे समुद्रातून किनाऱ्यावर येऊ लागल्याने पर्यटकानीही या किनारपट्टीकडे पाठ फिरवली आहे.
काही ठिकाणी मूठभर लांबीचे तेल गोळे आढळून आले आहेत. मागच्या तीन चार दिवसांपासून हा प्रकार चालू आहे अशी माहिती स्थानिक मच्छिमार पेले फर्नांडिस यांनी दिली. मात्र कालपासून हे प्रमाण कमी होत असल्याचेही त्याने सांगितले. या तेल गोळ्यामुळे किनाऱ्यावर मासळीचे जाळे आणनेही मुश्किल बनल्याचे त्याने सांगितले.
सध्या पर्यटन मोसम ओसरू लागल्याने किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत नाहीत. मात्र जे थोडेफार फिरकत होते त्यांनीही ही किनारपट्टी तेल तवंगामुळे चिकट झाल्याने येणे बंद केले आहे.
याबद्दल बोलताना, अखिल गोवा शॅक मालक कल्याण संघटनेचे अध्यक्ष क्रूझ कार्डोज यांनी मागच्या काही वर्षात तेलगोळे किनाऱ्यावर येण्याचे प्रमाण वाढले असून त्याचा पर्यटन व्यवसायावरही विपरीत परिणाम झाल्याचे सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.