डिचोली
पर्यावरणाच्या संहारामुळे मानवी जिवनावर होणारा वाईट परिणाम पाहता, आजच्या प्रगत काळातही निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे महत्वाचे आहे. आपण या धरती मातेचा ऋणी आहे या विचाराने प्रत्येकाने स्वतःच्या हातातून एक तरी झाड लावावे आणि ते जगवावे. असा उपक्रम जर प्रत्येकाने हाती घेतला, तर या निसर्ग व मानवाच्या संघर्षात आपले मोठे योगदान महान ठरणार, असे प्रतिपादन मयेचे सरपंच तुळशीदास चोडणकर यांनी केले.
गोमंतक भंडारी समाज डिचोलीतर्फे मयेतील महामाया हायस्कूल परिसरात आयोजित वनमहोत्सव कार्यक्रमात श्री. चोडणकर बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून मयेतील उद्योजक कालिदास कवळेकर, विजयानंद ज्ञानप्रसारक संस्थेचे सचिव उदय पत्रे, साखळी रवींद्र भवनचे उपाध्यक्ष विठोबा घाडी, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन नाईक, डिचोली भंडारी समाजाचे अध्यक्ष शशिकांत घाडी, महासचिव समीर वायंगणकर, खनिजदार अशोक नागवेकर, श्रीपाद कुंभारजुवेकर, काशिनाथ मयेकर आदी उपस्थित होते.
कालिदास कवळेकर यांनी आपल्या भाषणात, झाड लावणे हा आपला धर्म असून, आज जर निसर्ग जगला तरच मानव प्राणीजातंl जगणार. अशी परिस्थिती संपूर्ण जगात निर्माण झाली आहे. जग विकासाच्या नावाखाली कितीही पुढे गेले आणि प्रगत झाले तरी निसर्ग आणि मानव हा समतोल बिघडवून चालणार नाही. त्याचे वाईट परिणाम मानवजातीलाच भोगावे लागणार. त्यासाठी झाडे लावणे व ती जगविणे महत्त्वाचे आहे, असे म्हटले.
वृक्षारोपण कार्यक्रम हा आजच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील एक महत्वाचा आणि गरजेचा विषय आहे. पर्यावरणाचे जतन व संवर्धन पुढील काळासाठी किती गरजेचे आहे याचे शिक्षण आजच्या विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे, असे विजयानंद ज्ञानप्रसारक संस्थेचे सचिव उदय पत्रे यांनी म्हटले.
यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामाया हायस्कूलच्या आवारात विविध फळे व औषधी झाडांची रोपे लावण्यात आली. स्वागत भंडारी समाज संघटनेचे अध्यक्ष शशिकांत घाडी यांनी केले सांगितले. सूत्रसंचालन काशिनाथ मयेकर यांनी केले, तर समीर वायंगणकर यांनी आभार मानले.
|