पर्ये, : केरी, मोर्ले, पर्ये आदी भागातील वाळवंटी किनारी नदीच्या पाण्यात आंघोळीसाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. टाळेबंदीचा फज्जा उडवत केरीतील 'कळस कोण', मोर्लेतील 'उभो गुणो', केसरकर वाडा, बागवाडा, पर्ये आदी ठिकाणीच्या नदीच्या डोहात आंघोळीसाठी तरुण मोठ्या गटाने जमायचे. यात स्थानिकाबरोबर आसपासच्या गावातील तरुण पिढीचा सहभाग असायचा. असे तरुण येताना खाद्य पदार्थ, दारू-बियारच्या बाटल्या घेऊन यायचे. काही गट तर नदी किनारी आग पेटवून चिकन बनवणे- मासे भाजण्याचे कामही करायचे. येथे तर अशा गटांच्या दिवसभर सहली होताना दिसून आल्या. या सर्व प्रकारामुळे येथे प्लास्टिकचा कचरा, दारू बियारच्या बाटल्या टाकलेल्या पाहायला मिळत असून नदी किनारी कचऱ्याचा खच पाहायला मिळतो. तेव्हा संबंधित पंचायततीने सदर ठिकाणे साफ करावी, अशी मागणी होत आहे.
स्वच्छता न केल्यास
कचरा मिसळणार नदीत
वाळवंटी किनारी टाकण्यात आलेल्या या कचऱ्या इथले महत्त्वपूर्ण नदी डोह दुर्गंधीत झाले आहे. आता काही दिवसांनी पावसाळा सुरू होणार असल्याने त्यांची स्वच्छता करणे गरजेचे आहे नाही तर नदी किनारी असलेला कचरा पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाऊन समुद्रात मिसळणार. त्याचा परिणाम मत्स्यसंपदेवर होणार आहे. त्यामुळे त्याची स्वच्छता करणे आवश्यक आहे. म्हणून ही मागणी होताना दिसते.
नदी किनाऱ्याची स्वच्छता
राखण्यास यंत्रणा अपयशी
यंदा कोरोनाची टाळेबंदी असताना सुध्दा मोठ्या संख्येने तरुणांनी नदी किनारी जमा होऊन शारीरिक दूरी राखण्याचा फज्जा उडवला. नदी किनारी घडणाऱ्या या प्रकाराची माहिती पोलिसांनी देऊन सुध्दा त्यांनी त्याकडे बघ्याची भूमिका घेतली. तसेच स्थानिक पंचायतीने अशा ठिकाणी होणारी कचरा समस्यावर अजिबात उपाययोजना आखली नसल्याने हा कचऱ्याचा खच झालेला दिसतो. त्यामुळे सरकारने आता तरी याकडे लक्ष वेधून येथे तयार झालेला कचरा उचलावा अशी मागणी होत आहे. |
|