
Water Problem Issue : राज्यातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. पाणीटंचाईबाबत सरकारकडे तक्रारी करूनही कोणतीच सुधारणा होत नसल्याने नागरिकांना आता न्यायालयात धाव घेण्याची पाळी आली आहे.
दोनापावला येथील नागरिकांनी गोवा खंडपीठाला पाणी समस्येसंदर्भात पत्र पाठवले होते. ला ओशियाना कॉलनीमध्ये दरदिवशी ४५ मिनिटे ते सव्वातास मर्यादित पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचा दाबही कमी असतो व तो काही तासापुरता असल्याने तेथे पाण्याचा साठा करण्यासाठी असलेल्या टाक्यांमध्ये हे पाणी चढत नाही.
या भागातील इतर इमारतीमध्ये असलेली आस्थापने तसेच रहिवाशांकडून पाणी टंचाई समस्येबाबत तक्रारी येत नाहीत. यामुळे त्यांना ही समस्या उद्भवत नाही असे दिसून येते. त्यामुळे या परिसरात पाणीपुरवठा करण्यामध्ये काही गैरप्रकार होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या समस्येबाबत अधिक चौकशी न करता हे पत्र स्वेच्छा याचिका म्हणून दाखल करून घेण्यात येत आहे व संबंधित खात्याने मुबलक पाणीपुरवठा याचिकादारांना करावा असे त्यामध्ये नमूद केले आहे. राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून विविध भागात पाणी टंचाईची समस्या आहे. म्हापसा व खांडेपार या भागात जलवाहिनी फुटण्याचे प्रकारही घडले आहेत.
पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची मनमानी
काही ठिकाणी पाणी पोहचेपर्यंत तो बंद होतो अशी स्थिती आहे. पाणीपुरवठा करताना व्हॉल्व फिरवणारे कर्मचारी गैरप्रकार करत आहेत. हॉटेल्स व आस्थापने तसेच काही गृह संकुलामध्ये मुबलक पाणीपुरवठा या कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने होत असतो. त्यामुळे पाणी किती दाबाने कोणत्या परिसरात सोडायचे याचे नियंत्रण हे व्हॉल्व फिरवणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे असल्याने ते त्याचा दुरुपयोग करतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.