गोव्यात नव्या 60 अंगणवाड्या सुरू करू : स्मृती इराणी

गोव्याच्या 60 व्या मुक्तिदिनाच्या पार्श्वभूमीवर घोषणा
Smriti Irani News
Smriti Irani NewsDainik Gomantak

पणजी : गोव्याच्या 60 व्या मुक्तिदिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारतर्फे राज्यात नव्या 60 अंगणवाड्या सुरू केल्या जातील, अशी घोषणा केंद्रीय महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांनी आज दिली.

दोनापावला येथे आयोजित महिला आणि बाल कल्याण खात्याच्या उपविभागीय परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि पश्चिम विभागातील राज्यांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री इराणी म्हणाल्या, 2014 पूर्वी देशाची स्थिती अगदीच वेगळी होती. संपूर्ण व्यवहार प्रक्रियेमध्ये महिलांचे स्थान नावाला होते. मात्र, देशाचा विकास करायचा असल्यास त्याची सुरवात महिलांपासून करणे गरजेचे आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले आणि त्या पद्धतीने देशातील महिलांसाठी विविध योजना सुरू केल्या.

आज 1.90 कोटी महिला विविध पदांवर कार्यरत आहेत. यातील 14 लाख महिला या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करीत आहे.

Smriti Irani News
सागरी गुन्हेगारी रोखण्यासाठी मदत करा! : मुख्यमंत्री

यावेळी राज्य सरकारच्यावतीने राज्यात सुरू असलेल्या महिला आणि बाल कल्याण याविषयीच्या विविध योजनांची माहिती मंत्री विश्वजित राणे यांनी देताना सांगितले की, ‘‘राज्याच्या सर्वांगीण विकासामध्ये महिलांची भूमिका निर्णायक असून, राज्य सरकारच्यावतीने महिलांच्या सशक्तीकरणासाठी लाडली लक्ष्मी, गृहआधार, दीनदयाळ स्वास्थ सेवा योजना, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येतात.

राज्यात या योजनांचे दोन लाखांहून अधिक लाभार्थी आहेत. याशिवाय केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते.’’

तीन मागण्या त्वरित मान्य

दोनापावला येथील परिषदेत राज्य सरकारच्यावतीने तीन मागण्या करण्यात आल्या होत्या. या सर्व मागण्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्वरित मान्य करीत मागण्यांना मंजुरी दिली.

या तीन मागण्या म्हणजे राज्यातील 60व्या मुक्तिदिनानिमित्त 60 नव्या अंगणवाड्या सुरू करणे, प्रत्येक विभागात (ब्लॉक) दोन अत्याधुनिक अंगणवाड्या सुरू करणे, दक्षिण गोव्यात वनस्टॉप केंद्र उभारणे या मागण्यांना मंत्री इराणी यांनी त्वरित मंजुरी दिली.

त्यामुळे राज्यात आता अंगणवाड्यांना चांगले दिवस येणार आहेत. याबरोबरच महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू होणाऱ्या वनस्टॉप केंद्रामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी मदत होणार आहे.

2.80 कोटी महिला ‘डिजीटल’ साक्षर

केंद्र सरकारच्यावतीने गेल्या आठ वर्षांत केल्या जाणाऱ्या विविध प्रयत्नांमुळे देशातील 2.80 कोटी महिला ‘डिजीटल’ साक्षर झाल्या आहेत. पूर्वी महिलांना आक्षर आले की, साक्षर समजले जायचे. पण, निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग शून्य होता.

मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरगामी योजनांमुळे महिला केवळ साक्षरच राहिल्या नाहीत, तर त्या डिजीटल साक्षर बनल्या आहेत. आता विविध योजनांचे व्यवहार त्या डिजीटल माध्यमाद्वारे करीत आहेत.

त्याशिवाय देशातील 32 कोटी मुद्रा योजनांच्या लाभार्थीपैकी 70 टक्के महिला आहेत. ज्या देशाच्या आर्थिक व्यवहाराला हातभार लावून अर्थव्यवस्था मजबूत करीत असल्याची माहिती मंत्री इराणी यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com