डिचोली
राज्यात सध्या सुरू करण्यात आलेली खनिज वाहतूक केवळ खाणवाले व सरकार यांच्याच फायद्यासाठी न राहता या खनिज वाहतुकीसाठी कर्ज काढून आपले ट्रक तयार केलेल्या संकटग्रस्त ट्रकमालकांच्या भवितव्याचा विचार व्हावा. या मोसमात जरी रॉयल्टी भरलेल्या खनिजाचा साठा संपला, तरी पुढील मोसमात या ट्रकवाल्यांना शाश्वतपणे काम मिळणार याची खात्री सरकारने ठेवावी, अशी मागणी शिवसेनेचे राज्य सरचिटणीस मिलिंद गावस यांनी केली आहे.
खाणपट्ट्यातील जनतेची स्थिती आधीच गंभीर बनली आहे. त्यात सध्या रॉयल्टी भरलेल्या खनिजाची वाहतूक संपूर्ण गोव्यातील संबंधित खाण कंपन्यांनी सुरू केली आहे. कर्ज काढून ट्रकवाल्यांनी आपले ट्रक वाहतुकीसाठी तयार केले आहेत, असे श्री. गावस यांनी म्हटले आहे.
गोव्यात सध्या सरकारतर्फे सुरू करण्यात आलेली खनिज वाहतूक ही खाणवाले व सरकार यांच्याच फायद्यासाठी न राहता या खनिज वाहतुकीसाठी कर्जे काढून आपले ट्रक तयार केलेल्या संकटग्रस्त ट्रकमालकांच्या भवितव्याचा विचार व्हावा, अशी मागणी शिवसेनेचे राज्य सरचिटणीस मिलिंद गावस यांनी केली आहे.
सध्या रॉयल्टी भरलेल्या मालाची वाहतूक संपूर्ण गोव्यातील संबंधित खाण कंपन्यांनी सुरू केली असल्याने ट्रकवाल्यांनी आपले ट्रक या वाहतुकीतून काही तरी हातात मिळकत येणार या आशेने तयार केले आहेत. त्यासाठी त्यांनी कर्ज घेतले आहे. सध्या या ट्रकांना काम नसल्याने ट्रकमालक हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने त्यांच्या पुढील मोसमातीलही कामाची काळजी घेताना त्यांना खात्री द्यावी अन्यथा २०१८ साली ज्याप्रकारे सरकारच्या चुकीच्या धोरणासाठी खाणी बंद पडून या ट्रकवाल्यांना, मशीनरीवाल्यांना सरकारने संकटात लोटले होते. त्याप्रकारची स्थिती या ट्रक व मशीनरीवाल्यांवर पुन्हा ओढवू नये, असे मिलिंद गावस यांनी म्हटले आहे.
सध्या गोवा राज्य कोविड १९ पासून सुरक्षित असून ‘ग्रीन झोन’मध्ये आलेले असताना शेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये या विषाणूचे रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे गोवा राज्याला जास्त प्रमाणात धोका आहे. मात्र, सध्या सेझा (वेदांता) कंपनीसाठी बेल्लारी- कर्नाटक येथून खनिज मालाची वाहतूक होत आहे. तसेच या गाड्यांवर अत्यावश्यक सेवा म्हणून पास लावून आत खनिज माल भरून आणला जातो. या फसवणुकीत या गेटवरील पोलिस व शासकीय यंत्रणांचाही हात आहे. त्यासाठी बेल्लारी येथून येणारा माल हा गोव्यातील सीमा भागात खाली करून त्याची गोव्यात वाहतूक स्थानिक ट्रकांच्या मार्फत करण्यात यावी व बेल्लारीतील ट्रक माघारी पाठवावे. गोव्यातील ट्रक खाली असून त्यांना हे काम दिल्यास त्यांच्याही खिशात चार पैसे पडतील, असे मिलिंद गावस यांनी म्हटले आहे.
|