
एखाद्या वेळेस अपुरी झोप झाल्यास दुसऱ्या दिवशी आपल्या वागण्यावर, आपल्या कामावर त्याचा परिणाम दिसून येतो हे आपल्याला माहिती आहे. मात्र सतत अपुऱ्या झोपेच्या क्रमामुळे आपल्या मानसिक स्थितीवरही परिणाम होत असतो. झोप ही अन्न, पाण्याइतकीच आपली महत्त्वाची गरज आहे. ती आपल्या शरीराची एक जैविक गरज आहे. झोपेमध्ये आपल्या शरीरात महत्त्वाचे जैविक बदल होत असतात. यावरुन झोपेतील बिघाड आपल्या आयुष्यावर किती परिणाम होऊ शकतो याचा अंदाज येईल.
या अपुऱ्या झोपेमुळे दिवसाची सुरुवातच अनिच्छेसारख्या अवस्थेत तयार होते. उठून रोजची कामं सुरू करावीत असं वाटत नाही, अंग, खांदे जड झाल्यासारखं वाटतं. कंटाळा आणि उदास असल्यासारखं वाटू लागेल. यासर्व अवस्थेचा आपल्या कामावर परिणाम होतो. एकाग्र होऊन काम करणं अशक्य होतं. कामामध्ये रस वाटत नाही, सतत पेंगुळल्यासारखं वाटतं तर डोकंही जड झाल्यासारखं वाटतं.
झोप येणं आणि जाग येणं ही एकप्रकारची जीवनाची लय आहे असं मानलं जातं. चार दिवस जागरण केलं आणि एक दिवस झोपून काढला तर कदाचित आराम मिळेल पण झोपेची लय बिघडेल. त्यामुळे ही लय काम ठेवावी असं डॉक्टर सांगतात. झोपेची वेळ आणि आपला झोपेचा एकूण कालावधी कायम राखावा असं तज्ञ सुचवतात. एकाग्रता कायम राहावी, कामातला- रोजच्या जगण्यातला इंटरेस्ट कायम राहावा, स्मरणशक्ती चांगली काम करावी असं वाटत असेल तर चांगली व पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे.
मोबाईलसारख्या उपकरणांचा अतिवापर, ओसीडी-मंत्रचळासारखे आजार, आहार-विहाराच्या अयोग्य सवयी, व्यसनं, व्यायामाचा अभाव अशी कारणंसुद्धा झोप उडवण्यात आपापला हातभार लावत असतात.
अशा तणावपूर्ण जीवनात चांगली झोप व तीही पुरेशी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात.
दिवसभरात तुम्ही सतत कार्यरत राहिलात तसेच रोज पुरेसा आवश्यक व्यायाम केला असेल तर झोप वेळेत आणि चांगली येण्यास मदत होते.
ज्या पेयांमध्ये कॅफिन असतं तसेच अल्कोहोल असतं अशी पेयं टाळली पाहिजेत. कॅफिन आणि दारूमुळे झोपेत अडथळे निर्माण होतात.
तुम्ही ज्या खोलीत झोपता तेथे झोपेसाठी सुयोग्य वातावरण असलं पाहिजे. योग्य अंधार, स्वच्छता, शांतता, योग्य तापमान याचा झोपेसाठी उपयोग होतो. लॅपटॉप, मोबाईलसारखी उपकरणं लांब ठेवायला लागतील.
मनामध्ये एकदम उत्साही, चिंतेचे, अत्युच्च आवेगाचे विचार असतील तर झोपेत अडथळा येतो. तसेच उद्याबदद्लचे भरपूर विचार मनात साठले तरीही अशी समस्या उद्भवू शकते. अशावेळेस मनातील सर्व विचार, उद्या दिवसभरात करायच्या योजना एखाद्या कागदावर लिहाव्यात त्यामुळे मनाला विश्रांती घेण्याची संधी मिळेल.
आता इतके करुनही झोप येण्यास अडथळा येत असेल तर झोपेसाठी न झगडता उठून एखादे हलके साधे काम करावे, नंतर झोप आल्यावर पुन्हा झोपावे. एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल किंवा कोणत्याही शारीरिक, मानसिक व्याधी असतील तर डॉक्टरांना भेटून त्यावर उपचार घ्यावेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.