
Asia Cup 2023: आशिया चषकाचा सुपर 4 सामना मंगळवारी (12 सप्टेंबर) कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात खेळला गेला.
भारताने या सामन्यात श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारत याआधी 10 वेळा आशिया चषकाची फायनल खेळला आहे. 10 फायनल खेळून भारताने आतापर्यंत 7 वेळा आशिया चषकाच्या ट्रॉफीवर कब्जा केला आहे.
टीम इंडियाची (Team India) नजर आता आशिया चषकाच्या आठव्या विजेतेपदावर आहे. आशिया चषक 2023 च्या अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तान किंवा श्रीलंकेशी होऊ शकतो.
गुरुवारी 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सुपर-4 सामना होणार आहे. या सामन्यात दोन्हीपैकी कोणताही संघ जिंकेल तो, 17 सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध आशिया चषक 2023 चा अंतिम सामना खेळेल.
दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या फेरीत दोन्ही संघांनी विजयाने सुरुवात केली आहे.
याच मैदानावर झालेल्या शेवटच्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 228 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
भारताने सुपर-4 सामन्यात श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. आशिया चषक 2023 मध्ये भारताचा 4 सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे.
भारताने (India) यापूर्वी नेपाळचा 10 विकेट्सच्या फरकाने (DLS) पराभव केला होता. याशिवाय, 2 सप्टेंबर रोजी आशिया चषक 2023 च्या ग्रुप-ए मधील पाकिस्तानविरुद्ध भारताचा दुसरा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला.
सुपर-4 च्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव करत शानदार सुरुवात केली. सुपर-4 मध्ये श्रीलंकेविरुद्धचा सामना 41 धावांनी जिंकून भारताने आता 11व्यांदा आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
तत्पूर्वी, दुनिथ वेलालागे (40 धावांत पाच विकेट) आणि चरित असलंका (18 धावांत चार विकेट) यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेने भारतीय संघाला 49.1 षटकांत 213 धावांवर रोखले.
गेल्या 13 सामन्यांमध्ये सातत्याने विजयाची चव चाखणाऱ्या श्रीलंकेसाठी डावखुरा फिरकी गोलंदाज वेलालागेने 10 षटकात 40 धावा देत कारकिर्दीत प्रथमच पाच विकेट घेतल्या.
तर या सामन्यापूर्वी त्याने 38 धावांत केवळ एक विकेट घेतली होती. उजव्या हाताचा गोलंदाज असलंकाने 9 षटकात केवळ 18 धावा दिल्या.
एक दिवस आधी याच मैदानावर भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध दोन विकेट्सवर 356 धावा करत विक्रमी 228 धावांनी विजय मिळवला होता.
भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 48 चेंडूत 53 धावांची तूफानी खेळी खेळली आणि शुभमन गिल (13) सोबत पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली.
मात्र आज झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा फिरकीपटू दुनिथ वेलालागेने पहिल्या तीन षटकांत गिल, विराट कोहली (तीन धावा) आणि रोहित यांना बाद करुन भारतीय संघाला बॅकफूटवर आणले.
पाकिस्तानविरुद्ध नाबाद शतक झळकावणाऱ्या लोकेश राहुल (39) आणि इशान किशन (33) यांनी चौथ्या विकेटसाठी 89 चेंडूंत 63 धावांची भागीदारी करुन सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेलालागेने ही भागीदारी मोडली.
यानंतर असलंकाने किशनला आऊट केले. त्यानंतर खालच्या फळीतील फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
अक्षर पटेल (26) याने मोहम्मद सिराज (नाबाद पाच) सोबत शेवटच्या विकेटसाठी 27 धावांची भागीदारी केली आणि संघाला 213 धावांपर्यंत नेले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पुन्हा एकदा शानदार सुरुवात करुन दिली होती.
रोहितने पहिल्याच षटकात आपला जलवा दाखवून दिला, तर गिलने पाचव्या षटकात कसून रजितविरुद्ध शानदार चौकार मारला. रोहितने सातव्या षटकात त्याच गोलंदाजाविरुद्ध षटकार मारुन वनडेत 10 हजार धावा पूर्ण केल्या.
रोहितने 248 सामने आणि 241व्या डावात हा आकडा गाठला. सर्वात कमी डावात 10000 धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत तो विराट कोहली (205 डाव) नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, कमी डावात 10000 धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत रोहितने सचिन तेंडुलकर (259 डाव), सौरव गांगुली (263), रिकी पाँटिंग (266), जॅक कॅलिस (272), महेंद्रसिंग धोनी (273). ब्रायन लारा (278), ख्रिस गेल (282) आणि सध्याचा भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड (287 डाव) यांसारख्या दिग्गजांना मागे सोडले.
रोहितने 10व्या षटकात श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाकाविरुद्ध चार चौकार मारुन पॉवर प्लेमध्ये भारतीय संघाची धावसंख्या 65 धावांवर नेली.
11व्या षटकात त्याने मथिश पाथिरानाच्या शॉर्ट बॉलवर त्याच्या आवडत्या पुल शॉटने चेंडू प्रेक्षकांकडे पाठवला.
विकेटच्या शोधात शनाकाने चेंडू वेलालागेकडे सोपवला होता. वेलालागेने पहिल्याच चेंडूवर गिलला बोल्ड केले. रोहितने पुढच्या षटकात पाथिरानाच्या चेंडूवर चौकार मारुन 44 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
त्यानंतर वेलालागेने कोहली आणि रोहितला बाद केले. रोहितने 40 चेंडूंच्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार ठोकले.
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या इशान किशनने वेलालागेला शानदार चौकार मारल्याने भारतीय संघाने 17.4 षटकात 100 धावा पूर्ण केल्या. मात्र, इशान फिरकीपटूंविरुद्ध धावा काढण्यासाठी धडपडताना दिसला.
राहुलने 28व्या षटकात वेललागेच्या सलग चेंडूंवर चौकार मारले, मात्र वेलालागेने त्याच्याच चेंडूवर राहुलला बाद केले. यानंतर किशनही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही आणि असलंकाच्या चेंडूवर वेलालागेकरवी झेलबाद झाला.
यानंतर वेलालागेने हार्दिक पांड्याला यष्टीमागे झेलबाद करुन वनडेत प्रथमच पाच बळी घेतले. तर असलंकाने रवींद्र जडेजा (चार), जसप्रीत बुमराह (पाच धावा) आणि कुलदीप यादव (शून्य) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून भारताच्या अडचणीत वाढ केली होती. मात्र, मोहम्मद सिराजने पुढील काही षटकांत अक्षर पटेलला चांगली साथ दिली.
सामन्याच्या 47 व्या षटकात पावसाने व्यत्यय आणल्याने सामना सुमारे 50 मिनिटे थांबवण्यात आला होता. सामना सुरु झाल्यानंतर अक्षरने दोन धावा घेत संघाला 200 च्या पुढे नेले.
49 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला, मात्र पुढच्याच षटकात तीक्षणाच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो सीमारेषेजवळ झेलबाद झाला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.