पृथ्वी शॉला खेळवणे अशक्य; एकच सामना पराभूत झाल्यानंतर भारतीय संघात किती बदल होणार आहेत?वाचा...

indian cricket team
indian cricket team

मेलबर्न- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीतील दारुण पराभवानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीसाठीची जास्त सखोल पूर्वतयारी सुरू केली आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि यष्टीरक्षक वृद्धिमान साहा यांची गच्छंती अटळ आहे. त्याचबरोबर संघात एकंदर पाच बदल करण्यापर्यंत विचार सुरू आहे.

तिसऱ्या कसोटीपर्यंत रोहित शर्मा संघात येणार नसल्यामुळे भारतीय फलंदाजीसमोरील आव्हान कठीण आहे. त्यामुळे सराव सामन्यात प्रभावी कामगिरी केलेला शुभमन गिल याला पृथ्वी शॉऐवजी संधी मिळणार हे जवळपास निश्‍चित आहे. साहा फलंदाजीत साफ अपयशी ठरल्याने संघव्यवस्थापन नाराज आहे. त्याच्याऐवजी सराव सामन्यात शतक केलेल्या ऋषभ पंतला पसंती देण्यात येणार, असेही संकेत मिळत आहेत.
मोहम्मद शमी दुखापतीमुळे उर्वरित मालिकेत खेळणार नाही. यामुळेही संघात बदल आवश्यक आहेत. संघव्यवस्थापन हनुमा विहारीऐवजी अष्टपैलू अजय जडेजाचा समावेश करण्याबाबतही विचार करीत आहे. 

विहारीऐवजी जडेजा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्‌वेंटी लढतीत चेंडू डोक्‍याला लागलेला रवींद्र जडेजा दुसऱ्या कसोटीच्यावेळी निवडीस उपलब्ध असेल. त्याचे अष्टपैलुत्व संघास जास्त उपयोगी पडेल, असा विचार होत आहे. त्याला संधी देण्यासाठी हनुमा विहारीस वगळण्याचा विचार होत आहे. जडेजाला घेतल्यास गोलंदाजीतही जास्त पर्याय उपलब्ध होतील, असा विचार होत आहे.

शमीऐवजी सिराज 
शमीच्या गोलंदाजी करणाऱ्या हाताला फ्रॅक्‍चर झाले आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी मोहम्मद सिराजलाच पसंती मिळण्याची दाट शक्‍यता आहे. सराव सामन्यात त्याने प्रभावी मारा केला होता. आयपीएलमधील त्याची ४-२-८-३ ही गोलंदाजी सर्वांच्या लक्षात आहे. 

कोहलीऐवजी राहुल 
कोहली पितृत्वाच्या रजेवर जाणार असल्याने बदली खेळाडू राहुल हा बदल अपेक्षितच होता. कर्नाटकच्या या फलंदाजाने मर्यादित षटकांच्या मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. राहुल तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो, एवढेच नव्हे तर डावाची सुरुवातही करू शकतो.

शॉऐवजी शुभमन गिल
पहिल्या कसोटीत पृथ्वी शॉ ० आणि ४ धावाच करू शकला. पॅट कमिन्स आणि मिशेल स्टार्कने पृथ्वीच्या बचावाच्या मर्यादा स्पष्ट केल्या. त्याच्याऐवजी सराव सामन्यात जास्त धावा केलेल्या शुभमन गिलची निवड अपेक्षितच असेल. पंजाबच्या या सलामीवीराने आयपीएलमध्ये ४४० धावा केल्या आहेत. त्याने सराव सामन्यात आक्रमणास चांगली मुरड घातली होती.

साहाऐवजी पंत
तीन वर्षांत साहाने कसोटी अर्धशतक केलेले नाही. त्याचे यष्टीरक्षण समाधानकारक आहे. पण फलंदाजीतील अपयशामुळे भारताचे शेपूट जास्तच लांबत आहे. सराव सामन्यात शतक करून रिषभ पंतने आपली उपयुक्तता दाखवली आहे. गत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतने चार सामन्यांत ५८.३३ च्या सरासरीने ३५० धावा केल्या होत्या. त्याचा प्रतिहल्ला ऑस्ट्रेलिया गोलंदाजांचे आत्मविश्‍वास खच्ची करणारा होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com