IND vs AUS 3rd ODI: कागांरुनी कशी केली टीम इंडियावर कुरघोडी? जाणून घ्या 5 कारणे

India vs Australia: चेन्नईला झालेल्या निर्णयाक वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध विजय मिळवत मालिकाही खिशात घातली.
India vs Australia
India vs Australia Dainik Gomantak

India vs Australia 3rd ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारी वनडे मालिकेतील तिसरा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) पार पडला. निर्णायक असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशा फरकाने विजय मिळवला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात सर्वबाद 269 धावा करत भारतासमोर 270 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 49.1 षटकात 248 धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या या पराभवामागील काय कारणे असू शकतात याचा घेतलेला आढावा.

India vs Australia
Suryakumar Yadav: टी20 मधील 'मिस्टर 360' वनडेत फ्लॉप! सूर्याचं चूकतंय कुठे? जाणून घ्या 4 महत्त्वाचे मुद्दे

1. सलामी जोडीचे वर्चस्व

ऑस्ट्रेलियची ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श ही सलामी जोडी भारतीय संघासाठी या वनडे मालिकेतील अखेरच्या दोन्ही सामन्यांत डोकेदुखी ठरली. दुसऱ्या वनडेत या दोघांनीच 121 धावांची भागीदारी झाली होती. तसेच या दोघांनी तिसऱ्या वनडेतही भारताला सुरुवातीच विकेट मिळू दिली नाही. त्यांनी ऑस्ट्रेलियाला 68 धावांची सलामी भागीदारी करत चांगली सुरुवात करून दिली होती. ज्याचा फायदा नंतर ऑस्ट्रेलियन संघाला झाला.

2. प्रत्येक खेळाडूच्या छोटेखानी खेळ्या

हेड (33) आणि मार्श (47) हे बाद झाल्यानंतर देखील स्टीव्ह स्मिथ (0) वगळता ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी छोट्याखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या नियमित अंतराने विकेट्स घेतल्या होत्या. पण ऑस्ट्रेलियाकडून येणारा फलंदाज 20-30 धावांदरम्यान धावा करून बाद होत होता.

ऑस्ट्रेलियाच्या 11 खेळाडूंपैकी 7 खेळाडूंनी 20 पेक्षा अधिक धावांची खेळी केली. तसेच 9 व्या क्रमांकावर आलेल्या एश्टन एगारने 17 धावा केल्या. तसेच अखेरच्या विकेटसाठी मिचेल स्टार्क आणि ऍडम झम्पा यांनी केलेली 22 धावांची भागीदारीही या सामन्यातील फरक ठरली. याचमुळे ऑस्ट्रेलियाला 49 षटकात सर्वबाद होऊनही 269 धावांची मजल मारता आली.

India vs Australia
IND vs AUS ODI: टाटा, बायबाय, खतम... कांगारूंनी मारलं चेन्नईचं मैदान! भारताला पराभूत करत मालिकाही जिंकली

3. फलंदाजी क्रमांकातील बदल

तिसऱ्या वनडेत भारताच्या मधल्या फळीच्या फलंदाजी क्रमवारीत काही बदल करण्यात आले होते. या सामन्यात केएल राहुल चौथ्या, अक्षर पटेल पाचव्या, हार्दिक पंड्या सहाव्या, तर सूर्यकुमार सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आले होते.

पण हा प्रयोग फारसा भारताच्या फायद्याचा ठरलेला दिसला नाही. कारण या चौघांपैकी हार्दिकचा अपवाद वगळला, तर अन्य खेळाडू खास काही करू शकले नाही. केएल राहुलने 32 धावांची खेळी केली, पण त्याने ही खेळी करताना 50 चेंडू खेळले.

भारताला सुरुवात चांगली मिळाली होती. भारताने 146 धावा झाल्या असताना तिसरी विकेट गमावली होती. मात्र, असे असतानीही मधली आणि तळातले फलंदाज भागीदारी रचत भारताला विजयापर्यंत पोहचवण्यात अपयशी ठरले. हाच मोठा फरक भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान राहिला.

4. ऑस्ट्रेलियाची नियंत्रित गोलंदाजी

भारतीय संघ 270 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यानंतर आणि चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने शिस्तबद्ध गोलंदाजी केली होती. त्यामुळे भारताला धावगती वाढवण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाकडून पाच गोलंदाजांनीच गोलंदाजी केली, त्यांना ज्यादाच्या पर्यायाची गरजही भासली नाही.

महत्त्वाचे म्हणजे मिचेल स्टार्क वगळता अन्य चारही गोलंदाजांनी 5 किंवा त्यापेक्षा कमी इकोनॉमी रेटने धावा दिल्या. त्यामुळे अखेरपर्यंत ऑस्ट्रेलियन संघ सामन्यात टिकून राहिला आणि त्यांनी सामनाही जिंकला

India vs Australia
IND vs AUS: फक्त सिरिजच नाही, नंबर वनचा ताजही गमावला, ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला दुहेरी धक्का

या सामन्यादरम्यान स्मिथला फलंदाजीत फार काही करता आले नसले, तरी त्याने नेतृत्वात आपली छाप सोडली. त्याने गोलंदाजीत केलेले बदल आणि क्षेत्ररक्षणातील बदल महत्त्वाचे ठरले. तसेच त्याचे वैयक्तिक क्षेत्ररक्षणही चांगले राहिले.

5. फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व

चेन्नईतील चेपॉक स्टेडियममध्ये फिरकी गोलंदाजांना मदत मिळत असते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे तिसऱ्या वनडेतही फिरकी गोलंदाजांना मदत मिळालेली दिसली. भारताचे फिरकीपटू कुलदीप यादवला 3 विकेट्स मिळाल्या, तर अक्षर पटेलला 2 विकेट मिळाल्या.

पण ऑस्ट्रेलियाकडेही फिरकीचे चांगले पर्याय असल्याने त्यांनाही याचा फायदा झाल्याचे दिसले. ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने महत्त्वाच्या 4 विकेट्स घेतल्या, तर ऍश्टन एगारने सलग दोन चेंडूत विराट आणि सूर्यकुमार यादवला माघारी धाडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com