Ajinkya Rahane Team India Comeback: 'जेव्हा वगळण्यात आले...' टीम इंडियातील कमबॅकबद्दल बोलताना रहाणे झाला इमोशनल

अजिंक्य रहाणेने दीड वर्षांनी WTC Final साठी भारतीय संघात पुनरागमन करण्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Ajinkya Rahane
Ajinkya RahaneDainik Gomantak

Ajinkya Rahane on Team India Comeback: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात अजिंक्य रहाणेचीही निवड करण्यात आलेली आहे.

रहाणेचे तब्बल दीड वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याने भारताकडून अखेरचा कसोटी सामना जानेवारी 2022 मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले. पण आता त्याने पुन्हा भारतीय संघात पुनरागमन झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

राहणेने बीसीसीआयशी बोलताना सांगितले की '18-19 महिन्यांनंतर पुनरागमन करताना, जे काही घडले आहे, चांगले किंवा वाईट, मला माझ्या भूतकाळाचा विचार करायचा नाही. मला फक्त नव्याने सुरुवात करायची आहे आणि मी जे काही करत होतो, तेच करत राहायचे आहे.'

रहाणे नुकताच आयपीएल 2023 स्पर्धा खेळल्यानंतर भारतीय संघात सामील झाला आहे. आयपीएल 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा तो महत्त्वाचा भाग होता.

Ajinkya Rahane
Ajinkya Rahane: उपकर्णधारपद गेलं, टीममधील जागाही गेली, पण IPL 2023 च्या पहिल्याच मॅचमधून ठोकली कमबॅकची दावेदारी

याबद्दलही तो म्हणाला, 'चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळण्याची मी मजा घेतली. मी संपूर्ण हंगामात फलंदाजी करत होतो. खंरतर त्याआधीही मी देशांतर्गत क्रिकेट खेळलो. माझ्यासाठी देशांतर्गत क्रिकेटचा हंगामही चांगला गेला आणि मला छान वाटले. त्यामुळे हे पुनरागमन काहीसे भावूक आहे.'

त्याचबरोबर रहाणे म्हणाला, 'मी इथे येण्यापूर्वी आयपीएल आणि रणजी ट्रॉफीमध्ये ज्या मानसिकतने आणि ज्या हेतूने मी फलंदाजी केली, तशीच फलंदाजी मला करायची आहे. मला मी टी२० की कसोटी कोणत्या प्रकारात खेळतोय, याचा विचार करायचा नाहीये. मी आत्ता ज्याप्रकारे फलंदाजी करतोय, त्याकडे पाहाता मला गोष्टी गुंतागुंतीच्या करायच्या नाहीत. मी जेव्हा गोष्टी साध्या ठेवेल, तेवढेच माझ्यासाठी चांगले असेल.'

रहाणेने रोहित शर्माच्या नेतृत्वाचेही कौतुक केले आहे. त्याने सांगितले की 'मला वाटते भारतीय संघातील वातावरण सध्या चांगले आहे. रोहित भारतीय संघाला चांगल्या प्रकारे सांभाळत आहे आणि मला खात्री आहे की राहुल (द्रविड) भाई देखील भारतीय संघाला चांगले साभाळत आहे. त्यामुळे मदत मिळते आणि वातावरणही चांगली राहिले. जे मी आत्ता पाहात आहे, त्यानुसार प्रत्येकजण एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत आहे.'

याशिवाय रहाणेने गेल्या दीडवर्षात त्याच्या कुटुंबाने आणि मित्रपरिवाराने दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

तो म्हणाला, 'माझ्यासाठी हा भावूक क्षण होता. जेव्हा मला वगळण्यात आले, मला माझ्या कुटुंबाकडून मोठा पाठिंबा मिळाला. माझे नेहमीच भारतासाठी खेळण्याचे स्वप्न होते. भारतासाठी खेळणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी माझ्या फिटनेसवर कठोर परिश्रम केले आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये परत खेळण्यास सुरुवात केली.'

'बीसीसीआय आणि निवडकर्त्यांचे आभार. मी जेव्हा देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी परत गेलो, तेव्हा माझे भारतीय संघात परत येण्याचे लक्ष्य होते. रणजी ट्रॉफी असो आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी असो किंवा सराव सत्र असो, दररोज मी भारतासाठी पुन्हा खेळू शकेन या विचाराने उठत होतो.'

'मला पुनरागमन शक्य झाले कारण प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेतला, मग ते यश असो वा अपयश, आणि कोणतीही खंत न बाळगता. मुंबई रणजी संघातील प्रत्येक व्यक्तीकडून मी शिकलो. तुम्हाला दररोज क्रिकेटपटू म्हणून प्रगती करावी लागेल, शिकण्याची प्रक्रिया थांबली जाता कामा नये.'

Ajinkya Rahane
Ajinkya Rahane: 'जेव्हा कानांपाशी सर्व गोष्टी...', CSKकडून तुफानी फलंदाजीमागचं रहाणेने सांगितले कारण

याशिवाय इंग्लंडमध्ये खेळण्याबाबत रहाणे म्हणाला, 'इंग्लंडमध्ये तुम्हाला फक्त खेळपट्टीचाच नाही, तर वातावरणाचाही विचार करावा लागतो. जरी तुम्ही ७० धावांवर खेळत असला, तरी इंग्लंडमध्ये तुम्ही सुरक्षित समजू शकत नाही.'

अजिंक्य रहाणेने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 82 सामने खेळले असून या सामन्यांमध्ये त्याने 38.52 सरासरीने 4931 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 12 शतकांचा आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे.

रहाणे डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान पार पडलेल्या रणजी ट्रॉफी 2022-23 स्पर्धेत मुंबईकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने या रणजी स्पर्धेत 7 सामन्यांमध्ये 57.63 च्या सरासरीने 634 धावा केल्या. यामध्ये त्याच्या एका द्विशतकाचाही समावेश आहे. त्याने हैदराबादविरुद्ध हे द्विशतक ठोकले होते. तसेच त्याने आसामविरुद्ध 191 धावांची खेळीही केली होती.

त्याचबरोबर आयपीएल 2023 मध्येही त्याने शानदार कामगिरी करताना 14 सामन्यांमध्ये 32.60 च्या सरासरीने आणि 172.49 च्या स्ट्राईक रेटने 326 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com