Virat Kohli: किंग कोहलीच्या 74 व्या शतकाची पाकिस्तानी क्रिकेटपटूंनाही भुरळ! पाहा ट्वीट्स

विराट कोहलीने 46 व्या वनडे शतक झळकावल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूंनीही कौतुक केले आहे.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे मालिका नुकतीच संपली. या मालिकेत विराट कोहलीने दमदार कामगिरी करताना दोन शतके झळकावली. त्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला. दरम्यान, रविवारी झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात विराटने शतकी खेळी केल्यानंतर त्याचे पाकिस्तानी क्रिकेटपटूंकडूनही कौतुक करण्यात आले.

विराटने तिरुअनंतपुरम येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत 110 चेंडूत नाबाद 166 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 8 षटकार मारले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 74 वे शतक आहे. तसेच वनडे क्रिकेटमधील 46 वे शतक आहे.

(Pakistani Cricketers hails Virat Kohli after 46th ODI Century)

त्याच्या या शतकानंतर क्रिकेटविश्वातून त्याचे कौतुक झाले. दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेटपटू अहमद शेहजादने लिहिले आहे की 'त्याचे खरंच पुनरागमन झाले. विराटचे 46 वे वनडे शतक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 74 वे शतक. गेल्या 4 वनडे सामन्यांतील त्याचे तिसरे शतक आणि लोक म्हणत होते, तो संपलाय.'

तसेच पाकिस्तानी गोलंदाज हसन अलीने लिहिले आहे की 'महान विराट कोहलीचे 46 वे शतक झाले आहे.'

विराट कोहलीने त्याच्या 46 शतकांपैकी 5 वेळा 150 धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याने रविवारी केलेली नाबाद 166 धावांची खेळी त्याची वैयक्तिक दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वनडे खेळी ठरली आहे. यापूर्वी त्याने 2012 साली पाकिस्तानविरुद्ध 183 धावांची मीरपूरला खेळी केली होती.

तसेच आता विराट सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक वनडे शतकांच्या विक्रमाच्या जवळ पोहचला आहे. सचिनने त्याच्या वनडे कारकिर्दीत 49 शतके केली आहेत. त्याचा हा विक्रम मोडण्यासाठी विराटला केवळ 4 शतकांची गरज आहे. त्याने आणखी 3 शतके केल्यास तो सचिनच्या या विक्रमाची बरोबरी करेल.

दरम्यान विराटने सचिनचा मायदेशातील सर्वाधिक वनडे शतके करण्याचा विक्रम मोडला आहे. विराटचे मायदेशात 21 वनडे शतके झाली आहेत. तर सचिनच्या नावावर मायदेशात 20 शतके करण्याचा विक्रम आहे.

भारताने जिंकली मालिका

भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध रविवारी झालेला तिसरा वनडे सामना ३१७ धावांनी जिंकला. याबरोबरच भारताने तीन सामन्यांची वनडे मालिकाही ३-० अशा फरकाने जिंकली. भारताने या मालिकेतील पहिला सामना ६७ धावांनी आणि दुसरा सामना ४ विकेट्सने जिंकला. या मालिकेतील पहिल्या सामन्यातही विराटने ११३ धावांची खेळी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com