नवी दिल्ली : मिशेल स्टार्कचा चेंडू रवींद्र जडेजाच्या हेल्मेटवर लागला त्यावेळी भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल मैदानावर का आले नाहीत आणि त्यानंतर भारताने ‘कन्कशन सबस्टीट्यूट’च्या नियमाचा वापर करत बदली खेळाडू खेळवला. त्यामुळे भारतीय संघाने ‘कन्कशन सबस्टीट्यूट’ नियमाचा भंग केला, असे मत भारताचे माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुक्रवारी झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात रवींद्र जडेजाने तुफानी टोलेबाजी करून भारताला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. या दरम्यान त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला, त्यामुळे तो धावू शकत नव्हता, गोलंदाजीही करणे अशक्य होते, परंतु अखेरच्या षटकात स्टार्कचा उसळता चेंडू हेल्मेटला लागला. भारतीय संघाने ‘कन्कशन सबस्टीट्यूट’ या नियमाचा आधार घेत युजवेंद्र चहला खेळवले आणि त्याने तीन विकेट मिळवत विजय सोपा केला होता.
या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचे समालोचन मांजरेकर करत आहेत. सामनाधिकाऱ्यांनी भारताची मागणी नियमानुसार ग्राह्य धरली असली तरी भारतीयांनी नियमाचा फायदा घेतला आहे. जेव्हा फलंदाजाच्या डोक्यावर चेंडू लागतो तेव्हा फिजिओ लगेचच मैदानात येऊन फलंदाजाची तपासणी करत असतो. अशा परिस्थितीत भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल यांनी मैदानात यायला हवे होते, परंतु ते न आल्यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, असे मांजरेकर म्हणतात. प्रश्न विश्वासार्हतेचा आहे, दुखापतीबाबत प्रश्नचिन्ह उभा झाला आहे. २ ते ३ मिनिटे तरी फिजिओ मैदानात आले असते तरी एवढा आक्षेप कोणी घेतला नसता, असे मांजरेकर यांनी म्हटले आहे.
मूडीकडूनही आक्षेप
जडेजासाठी चहल बदली खेळाडू आला हा माझा आक्षेप नाही, परंतु चेंडू हेल्मेटला लागल्यावर फिजिओ किंवा डॉक्टरांनी मैदानात यायला हवे होते, असा आक्षेप ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचक टॉम मूडी यांनीही घेतला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.