पणजी : जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून जनतेच्या सेवेची संधी आहे. ती संधी घेत सरकारी कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात जिल्हा पंचायत सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे केले.
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार, मंडळ अध्यक्ष, मंडळ सरचिटणीस आणि मंडळ प्रभारी यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील त्रिस्तरीय लोकशाही पद्धतीत जिल्हा पंचायतींची भूमिका महत्त्वाची असते. सरकार आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून जिल्हा पंचायती काम करू शकतात. केवळ विकासकामे मंजूर करण्यापुरत्या जिल्हा पंचायती मर्यादित न राहता त्या विकास पुढे नेणाऱ्या साधन झाल्या पाहिजेत. यासाठी समाजातील समस्या ओळखून घेत त्या सोडवण्यासाठी सक्रिय सहभाग हा जिल्हा पंचायत सदस्याने नोंदवला पाहिजे.
प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पक्षाच्या ध्येय धोरणांविषयी माहिती देत राज्य सरकार भाजपचे आहे, केंद्रातही भाजपची सत्ता आहे. त्यामुळे मधल्या लोकशाही व्यवस्थेतही भाजपचेच उमेदवार निवडून येणे का आवश्यक आहे याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. संघटनसचिव सतीश धोंड यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
निवडणूक आचारसंहितेविषयी पुंडलिक राऊत देसाई यांनी मार्गदर्शन केले. सरचिटणीस दामोदर नाईक यांनी विविध समित्यांच्या कामाविषयी माहिती दिली. मंडळ प्रभारींच्या कामाबाबत सरचिटणीस अॅड. नरेंद्र सावईकर यांनी मार्गदर्शन केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.