‘मिरामार' पर्यटक क्रूझला मंत्र्यांची आडकाठी बोटीचे ८० टक्के काम पूर्ण; २० टक्के काम शिल्लक

Goa-cruise
Goa-cruise

पणजी: कमी अंतरावरील बंद केलेल्या फेरीबोटींपैकी एक बोट ‘मिरामार’ म्हणून मनोरंजनासाठी वापरण्याचे काम पाच वर्षांपूर्वी सुरू झाले. त्या फेरीबोटीत कराव्या लागणाऱ्या दुरुस्त्यांपैकी ८० टक्के काम नदी परिवहन खात्याच्या कार्यशाळेने पूर्ण केले. परंतु या जहाजाचे २० टक्के राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी कार्यशाळेला आलेल्या अडचणींकडे दुर्लक्ष केले आणि खात्याचे मंत्री मिलिंद नाईक यांनी यावर्षीच्या जानेवारी महिन्यात ६ तारखेला या बोटीवर काहीच खर्च करू नका, असे स्पष्ट बजावले आहे. दरम्यान, कार्यशाळेने त्या बोटीवर ३० लाख रुपये केलेला खर्च असाच वाया जाणार की काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

परतु नोव्हेंबर २०१९ मध्ये पर्वरी येथील महालेखापालांनी आपल्या निरीक्षण अहवालात ‘मीरामार’ या क्रूझ बोटीच्या रखडलेल्या कामाविषयी ताशेरे ओढले. अहवालानंतर या फेरीबोटीचे क्रूझमध्ये परिवर्तीत करण्याच्या उरलेल्या कामासाठी कार्यशाळेने खात्याच्या मंत्र्यांकडे परवानगी मागितली पण ती दिली नाही. विशेष म्हणजे जलमार्गावरून बंद झालेल्या फेरीबोटीचे क्रूझबोटीत परिवर्तीत करण्याचे अशक्य काम खात्याने कार्यशाळेला सांगितले. कार्यशाळेचा व्यवस्थापक या नात्याने बंदर कप्तानांनी खात्याला हे काम ‘शक्य नाही’ असे कळवायला हवे होते, पण तसे झाले नाही. उलट या कामात अनेक अडथळे येऊन ते काम रखडले गेले.

महालेखापालांच्या निरीक्षण अहवालात या कामावर बोट ठेवल्याने खरेतर खात्याने त्याची गंभीरतेने दखल घ्यायला हवी होती. पण आता ‘मिरामार' या क्रूझबोटीचे २० टक्के काम उरले आहे. प्राप्त माहितीनुसार या कामात कर्मचाऱ्यांच्या पगारावर, वेल्डिंग, रंगकाम अशा इतर कामांवर २९ लाख रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित १ लाख ४५ हजार रुपयांचे साहित्य आणले गेले आहे. ‘मिरामार' या बोटीचे काम विलंबासाठी कारणे काय आहेत याचा शोध नदी परिवहन ख्यात्याने करायला हवा होता, पण तसे झालेले नाही. खात्याला शिल्लक राहिलेले २० टक्के काम पूर्ण करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली, पण ‘मिरामार’ बोटीवर काहीच खर्च करू नका, असे स्पष्ट बजावले आहे.

मिलिंद नाईक यांची तत्परता
नदी परिवहन खात्याचे मंत्री मिलिंद नाईक यांनी आपल्या खात्याच्या कार्यशाळेने महालेखापालांच्या अहवालानंतर उर्वरित २० टक्के काम पूर्ण करण्यासाठी परवानगी मागितील्यानंतर ज्या तत्परतेने ते काम थांबविण्यास सांगितले. तशा प्रकारची तत्परता मंत्री नाईक यांनी खात्यात चाललेल्या अनागोंदीविषयी का दाखविली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. दै. ‘गोमन्तक’ने गेल्या आठवड्यापासून नदी परिवहन खात्यातील अनेक गौडबंगाल समोर आणले आहेत, पण त्याची चौकशी करण्याचे किंवा संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलण्याचे धारिष्ठ्य मंत्री नाईक यांनी दाखविणे अपेक्षित होते, परंतु तसे झालेही नाही. त्यामुळे आतातरी मंत्री नाईक हे आपले मौन सोडून खात्यातील कारभाराच्या चौकशीला सुरवात करणार का, हे पाहणे उचित ठरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com