पेडणे,
‘कोविड-१९’च्या पार्श्वभूमीवर विदेशात असलेल्या गोमंतकीय दर्यावर्दीना घेऊन मुंबईहून सुटलेली तिसरी बस काल (मंगळवारी) रात्री दीड वाजता वाजता बारा जणांना घेऊन पत्रादेवी येथे पोहचली. पहिल्या बसमधून २०, दुसऱ्या बसमधून २८ तर तिसऱ्या बसमधून १२ मिळून एकूण ६० दर्यावर्दी गोव्यात पोहचले.
पत्रादेवी येथील तपासणी नाक्यावर पोहचल्यावर येथे असलेल्या आरोग्य खात्यातर्फे वाहनातील प्रत्येक प्रवाशाचे प्रेशर गनने तापमान मोजले जाते. तापमान जास्त आढळल्यास त्याला कॉरन्टाइन केले जाते किंवा गोव्याचा हद्दीत प्रवेश देण्यात येत नाही. पण, या सर्व दर्यावर्दींची मुंबईत कोरोना संदर्भात तपासणी झाली असून, सगळेजण कोरोनामुक्त असल्याचे जाहीर करण्यात आले. असे असले तरी त्यांना पत्रादेवी येथे तपासणीसाठी बसमधून न उतरविण्याचा निर्णय झाला होता. या बसमध्ये असलेल्या दर्यावर्दी प्रवाशांचे मोबाईलवर घेण्यात आलेली छायाचित्रे तपासणी नाक्यावर असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना बसमधील चालकाने उतरून दाखवली. या तिन्ही बसच्या खिडक्यांच्या काचा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर नियोजित ठिकाणी बस जाण्यास निघाली. बसेसना राखीव पोलिसांची गाडीने पुढे राहून पायलटिंग केले.
|