चीन काही सुधरणार नाही! गलवान संघर्षानंतर चीनकडून सायबर हल्ल्यात मोठी वाढ

China Cyber
China Cyber

भारत आणि चीन यांच्यात मागील वर्षाच्या मे महिन्यात लडाख मधील गलवान भागात सीमावाद उफाळला होता. आणि त्यानंतर मागील वर्षाच्याच जून महिन्याच्या मध्यात दोन्ही देशांच्या सैन्यात मोठा संघर्ष उफाळला होता. व याच्या काही दिवसानंतर ऑक्टोबर महिन्यात चीनच्या काही हॅकर्सने भारतातील वीज सुविधांना निशाणा बनवल्याचे वृत्त अमेरिकेच्या एका संस्थेने नुकतेच दिले होते. मात्र यावर कोणताही पुरावा समोर आला नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिली होती. परंतु आता चिनी हॅकर्स भारतीय सायबर स्पेस क्रॅक करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली आहे. आणि मागील वर्षांपासून चीनचे हॅकर्स यात आक्रमकतेने प्रयत्न करत असल्याचे समजते. 

कॉम्पुटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-आयएन) आणि नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर (एनसीआयआयपीसी) यासारख्या विविध सरकारी संस्था चीनच्या गॅल्वाननंतरच्या संघर्षानंतर सायबर विषयक घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. आणि तज्ज्ञांनी गेल्या वर्षापासून चीनकडून होत असलेल्या सायबर घुसखोरीच्या प्रयत्नात वाढ झालीय असल्याचे म्हटले आहे. तसेच भारताने चिनी ऍप्सवर बंदी घातल्यानंतर यामध्ये आणखीन वाढ झाली असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. त्यानंतर अलीकडेच भारतातील कोरोना प्रतिबंधक लस निर्मिती करत असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांमध्ये देखील चीनच्या एपीटी10 या समूहाने सायबर घुसखोरी केली असल्याची माहिती मिळाली होती. पण या दोन्ही कंपन्यांनी याबाबत कोणतीही माहिती उघड केली नव्हती. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीईआरटी-आयएन ही संस्था या प्रकरणाची देखरेख करत आहे. 

याव्यतिरिक्त, तेलंगणा राज्यातील वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी सीईआरटी-आयएन कडून सायबर घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चिनी व्हायरसविषयी सतर्क राहण्याची सूचना मिळाली असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर केंद्रीय उर्जामंत्री आर. के. सिंह यांनी, मागील वर्षी महाराष्ट्रातील मुंबई मध्ये विजेच्या बाबतीत घडलेल्या घटनेत चीनचा हात असल्याचे म्हटले जात असताना सतर्क राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच, अशा प्रकारच्या घटनांपासून सावधानता बाळगण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर, चिनी हॅकर्स मुख्यत्वे वैयक्तिकऐवजी मोठ्या संस्थांवर लक्ष केंद्रित करतात, असा दावा सूत्रांनी केला आहे.

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (एनटीआरओ) च्या अंतर्गत येणार्‍या एनसीआयआयपीसीने अलीकडेच चीनकडून हल्ले करण्याविषयी चिनी हॅकर्स आणि त्यांच्या कार्यप्रणालीविषयी तपशीलदेखील नोंदविला आहे. यानंतर चीनच्या घुसखोरीबद्दल एनसीआयआयपीसी माहिती देताना, एपीटी27 हा एमिझरी पांडा म्हणून देखील ओळखला जात असल्याचे सांगितले आहे. आणि हा हॅकर्सचा गट सरकारशी संबंधित डेटा मिळवण्यासाठी परदेशी दूतावास, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्र यात घुसखोरी करत असल्याची माहिती एनसीआयआयपीसीने दिली आहे. याशिवाय, एनसीआयआयपीसीने चीनच्या अजून एक हॅकर्स समूहाची माहिती दिली आहे. 

एनसीआयआयपीसीने एल्डरवुड नावाच्या चीन मधील समूहाची माहिती देताना, एल्डरवुड याच चिनी सायबर हेरगिरी समूहाने 2009 मध्ये गुगलवर हल्ला केल्याचे सांगितले. या समूहाने हायड्रॅक ट्रोजन हॉर्स वापरून ऑपरेशन अरोरा अंतर्गत गुगल मध्ये घुसखोरी केली होती. व गुगलनेही आपली माहिती चोरी झाली असल्याचे नंतर जाहीर केले होते. तर चीन सोबत सीमावाद वाढल्यानंतर प्रत्येकवेळेस चीनच्या सायबर हॅकर्स कढून घुसखोरीच्या प्रयत्नांमध्ये वाढ होत असल्याची माहिती विविध राज्य व केंद्रीय एजन्सीसमवेत काम करणारे सायबर तज्ज्ञ रक्षित टंडन यांनी दिली आहे.        

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com