पणजी: मंत्रिमंडळ बदलाविषयी ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांनी आपल्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. मंत्रिमंडळ फेरबदल हा कोणा मंत्र्याचा नव्हे, तर पक्षाचा विषय असतो, अशा शब्दांत लोबो यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. लोबो यांनी काल मंत्रिमंडळातून अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्याविषयी चर्चा केल्याचे सांगितले होते.
लोबो यांचा रोख पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीनंतर मंत्रिमंडळातील फेरबदलाचा विषय चर्चेत आहे. जाहीरपणे मंत्रिमंडळ फेरबदलाचा इन्कार केला जात असला तरी जिल्हा पंचायत व पालिका निवडणुकीनंतर हे फेरबदल होतील अशी माहिती मिळाली आहे. मात्र लोबो यांनी याविषयी जाहीरपणे वक्तव्य केल्याने मुख्यमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे नाराज झाले आहेत. त्यामुळे चर्चा झालीच नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सरळपणे सांगून लोबो यांना याविषयावर उघडे पाडले आहे.
तानावडे या संदर्भात विचारल्यावर म्हणाले, मंत्र्यांनी आपल्या खात्यांचाच विचार करावा. ते खाते जनतेला अधिकाधिक सोयी सुविधा, सेवा कसे देईल याचा सदोदीत विचार करावा. कोणाला मंत्रिमंडळातून काढणार की कोणाचा मंत्रिमंडळात समावेश करणार याचा फार विचार करू नये. लोबो यांनी केलेले वक्तव्य वैयक्तीक होते, पक्षाच्या वतीने ते बोलू शकत नाहीत. मंत्रिमंडळ रचना हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, त्याबाबत ते पक्षाशी चर्चा करू शकतात. मुख्यमंत्री याविषयावर बोलत नाहीत तोवर त्यावर चर्चा नको.
आणखी वाचा:
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.