पणजी : आम आदमी पक्षाच्या आमदारांनी येथे येऊन आव्हाने दिल्यानंतर भाजपचेच कर्नाटकातील मंत्री आता गोवा सरकारला आव्हान देऊ लागले आहेत. कर्नाटकाचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांनी बेळगाव येथे बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हादई नदीचे पाणी बेकायदेशीरपणे कर्नाटकाने पळवले हा आरोप सिद्ध केला, तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊ असे आव्हान दिले. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, हा विषय न्यायप्रविष्ट आहे, कर्नाटकाने पाणी कसे पळवले आहे, याचे पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. त्यामुळे न्यायालयाबाहेर याविषयी चर्चा कशाला.
बेळगावच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात आचारसंहिता लागू झाल्याने नियोजित कळसा-भांडुरा प्रकल्पासंदर्भातील आज होणारी उच्चस्तरीय समितीची बैठक रद्द झाली. निवडणूक आयोगातर्फे ग्रामपंचायत निवडणुकीचे वेळापत्रक आज घोषित करण्यात आले. त्यानुसार आचारसंहिता लागू झाल्यामुळे विविध सरकारी कार्यक्रम, बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी कळसा-भांडुरा प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी स्थानिक आमदार व अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. परंतु, या दरम्यान आचारसंहिता जाहीर झाली. त्यानुसार जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बैठक घेता येत नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे बैठक रद्द करण्यात आली. मात्र त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, की कर्नाटकाने कोणतेही पाणी वळवलेले नाही. कोणतेही काम बेकायदेशीरपणे केलेले नाही. गोव्याचे मुख्यमंत्री उगाच आरोप करत असून त्यांनी आरोप सिद्ध केल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देऊ.
अधिक वाचा :
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.