Goa Curfew: कदंब महामंडळाला दररोज 20 लाख रुपये नुकसान; सविस्तर वृतांत

kadamba.jpg
kadamba.jpg

पणजी: दरवर्षी 120 कोटी रुपयाचे सरकारी अनुदान घेणारे कदंब महामंडळ (Kadamba Bus) नुकसानीत चालले आहे. त्यातच ‘कोरोना’ संकटामुळे राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे (Curfew) कदंब महामंडळाच्या 417 बसेस बंद ठेवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे कदंब महामंडळाला दररोज 20 लाख रुपये नुकसान (Loss) होत आहे. (Kadamba bus in Goa loses Rs 20 lakh due to curfew)

राज्यात संचारबंदी असली तरी 50 टक्के कदंबच्या बसेस सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे प्रवासी नसल्यामुळे कदंबच्या सध्या फक्त 117 बसेस विविध मार्गावर सुरू आहेत. त्यानांही प्रवासी फारच कमी आहेत. 

कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कदंब महामंडळाकडे 520 बसेस आहेत. त्यातील फक्त 117 सध्या सुरू आहेत. शाळा व उच्चमाध्यमिक विद्यालये बंद असल्याने त्यांच्यासाठी चालणाऱ्या कदंबच्या 126 बसेसही बंद आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारने गोव्यासाठी उपलब्ध केलेल्या  व गोव्यात दाखल झालेल्या 28 इलेक्ट्रीक बससेसही सध्या बंद असल्याचे घाटे यांनी सांगितले.

कदंब महामंडळ अनेक वर्षे नुकसनीत का चालते? या प्रश्‍नावर बोलताना घाटे यांनी सांगितले, कुठल्याच राज्याची सरकारी बससेवा फायद्यात नाही. कारण ज्या भागात खासगी बसेस जात नाहीत, पुरेसे प्रवासी नसतात अशा दुर्गम भागातील गावात कदंब बसेस सुरू असतात. तेथे प्रवासी मिळत नाहीत. मात्र, प्रवाशांची अर्थात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कदंब बसेस तेथे सुरू केल्या जातात. त्याचबरोबर पास काढणाऱ्या प्रवाशांना तब्बल 60 ते 70 टक्के तिकीटात सूट कदंब देते. नुकसान होण्याचे तेही एक कारण आहे. असेही घाटे यांनी सांगितले.

कदंब बस बंद असल्यामुळे महामंडळाला आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यातच बसेस बंद असल्याने व त्या एकाच जागी लावून असल्याने त्याची देखभाल यावरही खर्च होत असल्याने यावर वेळीच तोडगा निघणे गरजेचे आहे.

नुकसानीची अनेक कारणे...
कदंब महामंडळ सुरू झाल्यानंतर मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना दोन वर्षे कदंब फायद्यात आले होते. संजय घाटे यांनी कोरोना व पास योजनेमुळे कदंबला नुकसान होत असल्याचे  सांगितले असले तरी कदंबचे चालक अनेकवेळा खासगी बसच्या मागून जातात. एखादा प्रवासी असल्यास बस उभी करत नाहीत. त्याचबरोबर व्यवस्थापनात तसेच कदंबच्या गॅरेजमध्ये सुरू असलेली अनागोंदींही कदंबच्या नुकसानीला कारणीभूत आहे.

इलेक्ट्रीक बसेस बंद!
केंद्र सरकारने प्रदूषणविरहीत अशा महागड्या 50 इलेक्ट्रीक बसेस गोव्याला मंजूर केल्या होत्या. त्यातील 28 गोव्यात दाखल होऊन काही भागात त्या सुरुही केल्या गेल्या. मात्र जोरदार पाऊस आणि बसेससाठी आवश्‍यक चार्जिंग केंद्राची कमतरता यामुळे सध्या या 28 बसेसही बंदच आहेत. एकूणच सरकारच्या अनियंत्रित कारभाराचा फटका या बसेसनाही बसला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com